रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत वाद निर्माण झाला आहे. या जागेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आग्रही आहेत. तर, शिंदे गटाकजून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. किरण सामंत यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची पोस्ट केली होती. परंतु, आता ही पोस्ट हटवण्यात आली आहे. तर, या जागेवरून आमचा दावा कायम आहे, असं उदय सामंत यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे या जागेचा वाट मिटण्याची शक्यता नाही. किरण सामंत यांनी केली होती पोस्ट रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांचं नाव चर्चेत होतं. तर, भाजपानेही या जागेवर दावा केला आहे. महायुतीत या जागेवरून वाद निर्माण झाल्यानंतर किरण सामंत यांनी या स्पर्धेतून माघार घेतली. त्यांनी याबाबत पोस्ट करून माहिती दिली. ते म्हणाले, नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अब की बार ४०० पारसाठी रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार-किरण सामंत. असा दोन ओळींचा संदेश किरण सामंत यांनी लिहिला होता. परंतु, ही पोस्ट त्यांनी तत्काळ डिलिट केली. उदय सामंत काय म्हणाले? हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. येथे शिवसेनेचाच खासदार आहे. परंतु, ते सध्या ठाकरे गटाबरोबर आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेचीच आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्गची जागा शिवसेनेलाच मिळाली आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांचाही त्याच भावना आहे. किरण सामंत यांनी पोस्ट केल्यानंतर आम्ही बैठक घेतली. ही बैठक संपल्यानंतर त्यांनी पोस्ट डिलिट केली आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतलेली नाही. हेही वाचा >> रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, नारायण राणेंचा मार्ग मोकळा? नारायण राणे आक्रमक नारायण राणेंनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किरण सामंत यांच्याविषयीचा प्रश्न विचारला असता राणे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. तसंच लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून नारायण राणेंनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असून आजचा मेळावा हा त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आहे. याच वातावरतणात किरण सामंत यांची पोस्ट कोकणातील राजकारण भविष्यात कोणत्या दिशेनं जाणार याकडे लक्ष वेधणारी आहे. दरम्यान, अद्याप किरण सामंत यांनी अधिकृतपणे यासंदर्भात किंवा सोशल मीडिया पोस्टबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.