रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. पंतप्रधानपदी मोदी पुन्हा विराजमान व्हावेत यासाठी एक पोस्ट करत किरण सामंत यांनी माघार जाहीर केल्याची चर्चा आहे. किरण सामंत यांनी जर माघार घेतली तर नारायण राणेंचा मार्ग मोकळा झाला आहे अशीही चर्चा रंगली आहे. कोकणात रात्रीपासून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबत किरण सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली नाही. काय आहे किरण सामंत यांची पोस्ट? नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अब की बार ४०० पारसाठी रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार-किरण सामंत. असा दोन ओळींचा संदेश किरण सामंत यांनी लिहिला आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंत यांचा दबदबा आहे. मागच्या वर्षभरापासून लोकसभेसाठी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. त्याच अपेक्षेने सगळे कार्यकर्ते कामही करत होते. या सगळ्यांसाठी किरण सामंत यांची पोस्ट म्हणजे धक्का मानली जाते आहे. तसंच येत्या काळात यामुळे महायुतीत ऑल इज नॉट वेल सारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हं आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्यासाठी नारायण राणेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळेच किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. अशात किरण सामंत यांनी धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांच्या मनातली भावना आहे. किरण सामंत यांची पोस्ट व्हायरल. नारायण राणे आक्रमक नारायण राणेंनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत किरण सामंत यांच्याविषयीचा प्रश्न विचारला असता राणे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. तसंच लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून नारायण राणेंनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असून आजचा मेळावा हा त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आहे. याच वातावरतणात किरण सामंत यांची पोस्ट कोकणातील राजकारण भविष्यात कोणत्या दिशेनं जाणार याकडे लक्ष वेधणारी आहे. दरम्यान, अद्याप किरण सामंत यांनी अधिकृतपणे यासंदर्भात किंवा सोशल मीडिया पोस्टबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.