Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याने आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर एनडीआरएफची चार पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. याशिवाय मुंबई आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. इर्शाळवाडी गावात दरड कोसळली आहे. परंतु, हा भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता. तरीही येथे दरड कोसळल्याने चिंता व्यक्त केली जातेय. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "भूस्खलनाचे स्पॉट बदलत आहेत. जे दरडप्रवण क्षेत्र आहेत तिथे दुर्घटना होत नाहीत. जे यादीत नसतात, तिथे दुर्घटना होते. सध्या हवामानाचा पॅटर्न बदलेला आहे. सध्या कमी दिवसांत जास्त पाऊस असा पॅटर्न पाहायला मिळतोय. पावसाची टक्केवारी समानच असते. परंतु, जो पाऊस महिना-सव्वा महिन्यांत पडायचा तो पाऊस एक-दीड-तीन दिवसांत पडतोय." प्रशासनाला शिकायला मिळतं "या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता. टीम तैनात ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेणं कठीण जातं. मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनांमधून प्रशासनाला शिकायला मिळतं, असंही फडणवीस म्हणाले. .तर सक्तीने स्थलांतर करू "अशा प्रकारचे स्पॉट कुठे आहेत हे शोधावं लागेल. तेथील लोकांचं स्थलांतर करावं लागेल. परतु, स्थलांतर सोपं नसतं, नागरिकांची मानसिकता नसते. कारण तिथे त्यांची उपजीविका असते. कोकणात त्यांचे देवदेवता तिथे असतात. त्यामुळे स्थलांतर करणं सोपं नसतं. पण असे स्पॉट दिसल्यास सक्तीने स्थलांतर करण्याची भूमिका शासनाला स्वीकारावी लागेल", असाही इशारा फडणवीसांनी दिला.