महाराष्ट्राचील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरगड हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. माहूरगडची रेणुकादेवी अशीच या तीर्थस्थळाची ओळख. त्याचबरोबर ते ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिशय सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. इ.स.१२ व्या शतकामध्ये या गडाचे बांधकाम करण्यात आल्याचे सांगितले जाते. दसऱ्याच्या दिवशी माहूरगडावर मोठी यात्रा भरते. सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे हे स्थान म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गदेवतेने प्रगट होऊन आपल्या मुक्त सौंदर्याने नटवलेला प्रदेश आहे.रेणुकादेवीशी निगडीत अनेक अख्यायिका आहेत. त्या पैकी एक म्हणजे, राम नाव धारण करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूने रेणुकेच्या उदरातून जन्म घेतला. परशुधारी हा महापराक्रमी पुत्र पुढे परशुराम म्हणून प्रसिद्ध झाला. रेणुकादेवीचे आणखी एक रूप प्रगट होते. स्नानासाठी नदीवर गेली असता स्त्रियांसह नदीवर स्नान करणाऱ्या गंधर्वाला पाहून रेणुकेच्या मनात कामविकारण निर्माण होतो व जेव्हा ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व ही शिक्षा आपल्या पुत्रांनी आपल्यासमोर द्यावी, असा आग्रह धरतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.पाचवा पुत्र परशुरामास कैलासातून बोलावितात व त्यास आज्ञा करतात, तुझी आई रेणुका भागीरथी नदीवर स्नानास गेली असता तिने मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला कामूक भावनेने पाहिले. तेव्हा हे परशुरामा तू या दुराचारिणी व दुष्ट रेणुकेला तात्काळ ठार कर. पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. जमदग्नीलाही आपल्या क्रोधाचा पश्चाताप होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागून रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात.रेणुकादेवी क्रोध व क्षमाशिलतेसाठी देखील प्रसिद्ध आहे. क्रोधावर नियंत्रण करणे व योग्य वेळी क्रोधाचा उपयोग करणे या दोहोंचाही संगम म्हणजे रेणुकादेवी. जगन्माता रेणुका हे असेच जन्मातेचे एकरूप आहे. रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे.माहूरगड ते पुणे हे अंतर ५५४ किमी असून, पुण्याहून माहूरगडला जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाची बस पकडावी लागते. खासगी बसदेखील माहूरला जाण्यासाठी चांगला पर्याय आहे. पुणे-अहमदनगर-पैठण-जालना-वाशीम-पुसद-माहूर हा ५५४ किमीचा प्रवास करून माहूरगड येथे जाता येते. रेल्वेने नांदेडला जावून किनवट मार्गे माहूरला जाता येते.