सोलापूर : सोलापूरच्या आर्थिक विकासासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे पाणीवाटप नियोजन ढेपाळल्याळे यंदा जवळपास चार महिने अगोदर हिवाळ्यातच धरणातील पाणीसाठा मृत स्वरूपात खाली आला आहे. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठी निचांकी स्वरूपात म्हणजे उणे ७५ टक्क्यांपर्यंत खालावण्याची भीती व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात कोयना आणि जायकवाडीपेक्षा मोठे समजल्या जाणा-या एकूण १२३ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणाच्या पाण्यासंदर्भात राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी अन्याय होतच असतो. यातच नदी खोरेनिहाय जलव्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने भीमा खोरे पाणी वाटप सल्लागार समितीची समग्र बैठक एकात्मिक स्वरूपात न होता तुकड्या-तुकड्याने होते. त्यामुळे धरणातील पाण्याचे समन्यायी पध्दतीने वाटप होत नाही. स्थानिक राजकारणात बारामतीकरांच्या दावणीला बांधले गेलेले स्थानिक लोकप्रतिनिधी समन्यायी पाणी हक्कासाठी तोंड उघडत नाहीत. भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्येही निष्क्रियता दिसून येते.

हेही वाचा >>> सोलापूरजवळ गांजा तस्करी पकडली; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उजनी धरण मागील १५ आॕक्टोंबरपर्यंत सर्वाधिक ६०.६६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठवण करू शकले. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणातील  उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत  कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत पाणी नियोजन ठरले. बाष्पीभवन-२.६६ टीएमसी, जलाशय उपसा सिंचन-१.७२ टीएमसी, जलाशय बिगर सिंचन पाण्यासाठी-०.८३ टीएमसी, जलाशय बिगर औद्योगिक-०.५८ टीएमसी, जलाशयातील गाळ-२.२६ टीएमसी, सीना-माढा उपसा सिंचन योजना दोन आवर्तने-२.८४ टीएमसी, दहिगाव उपसा सिंचनटी योजना दोन आवर्तने-१.०३ टीएमसी अशा एकूण ११.९२ टीएमसी पाणी नियोजन २९ फेब्रुवारीपर्यंत आहे. तर एकूण रब्बी हंगामासह धरणाच्या खालील आणि वरील बाजूसाठी ४४.२७ टीएमसी एवढ्या पाणी वापराचे नियोजन आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत धरणात एकूण ४८.७२ टीएमसी पाणीसाठा आणि वजा १४.९५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा  (वजा २७.९० टक्के) गृहीत धरण्यात आला आहे. प्रत्यक्षात नियोजनापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडले जात असून दररोज सरासरी पाऊण टक्के पाणीसाठा रिता होत आहे. त्याचा विचार करता फेब्रुवारीपर्यंत नियोजनापेक्षा जास्त पाणीसाठा खालावण्याची आणि उन्हाळ्यात पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> सोलापुरात कांद्याचा वांदा सुरूच, उच्चांकी आवक; दर पार कोसळले

गेल्या मंगळवारी धरणातील पाणीसाठा उणे पातळीत आला असून आज अखेर धरणात पाणीसाठा वजा २.१९ टक्के आहे. दुसरीकडे धरणातून दहिगाव उपसा सिंचन योजना, कालवा, बोगदा अशा स्वरूपात पाणी सोडणे सुरूच आहे. त्याचा विचार करता येत्या उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा तब्बाल उणे ७५ टक्के एवढा निचांकी होण्याची आणि उन्हाळ्यात जलसंकट अधिक भीषण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. धरणात सध्या १५ ते २० टीएमसी एवढा गाळ साचला असल्याचे शासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. ते गृहीत धरल्यास धरणातील पाणीसाठ्याची स्थिती भयावह स्वरूप दर्शविते. यापूर्वीच्या सात वर्षांचा धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता २०१८ साली २३ मे रोजी धरण उणे पातळीत गेले होते. २०१९ मध्ये १५ मे रोजी तर २०२० मध्ये १३ मे रोजी धरण उणे पातळीत गेले होते. गेल्या वर्षी १३ एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा उणे स्थितीत आला होता. परंतु यंदा हिवाळ्यातच म्हणजे पाच महिने अगोदरच धरणाने उणे स्थिती गाठली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water level in ujani dam drops before five months zws