सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असून त्यासाठी निवडणूक जिंकण्याच्या सूत्रानुसारच उमेदवार दिले जाणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सोलापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बावनकुळे आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यात ४८ पैकी ४५ पेक्षा जास्त जागा त्यासुद्धा विक्रमी ५१ टक्के मते घेऊन जिंकण्याचा महायुतीचा संकल्प असल्याचा पुनरूच्चार केला. बावनकुळे म्हणाले, महायुतीसह भाजपचे केंद्रीय संसदीय मंडळाच्या नेतृत्वाकडून लवकरच राज्यातील कोणती जागा कोणाला सोडायची, याबाबत निर्णय घेणार आहे. त्यानंतर उमेदवारीचाही निर्णय होणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असल्यामुळे उमेदवार निवडून येण्याची जी काही सूत्रे आहेत, ती सूत्रे ज्यांच्याकडे असतील, त्या आधारे ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी उमेदवार ठरविण्याचा निर्णय होईल. सोलापुरातही अतिशय चांगला उमेदवार दिसेल. जसा सोलापूरचा उमेदवार सोलापूरचा असेल, तेवढाच चांगला उमेदवार हातकणंगले, नागपूर आदी सर्व जांगांवर दिसेल, असा दावा बावनकुळे यांनी केला. हेही वाचा - नाशिकमध्ये जानेवारीत राष्ट्रीय युवा महोत्सव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन हेही वाचा - “व्याघ्रभूमीत आता ऑलिम्पिक खेळाडूही घडतील”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; ६७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशातील ९८ टक्के जनता पसंत करते, असाही दावा करताना बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निघणाऱ्या भारत न्याय यात्रेवर टीका केली. मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.