कोणत्याही पार्श्वभूमीवर प्रेम फुलतेच या पार्श्वभूमीवर कलर्स वाहिनीचे भयपट नाटय़ कौन है मध्ये नवीन लग्न झालेले जोडपे ईशिता दत्ता आणि वत्सल सेठ प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. हिरण्यकश्यपू आणि त्याचा भाऊ हिरण्याक्ष यांच्या पौराणिक कथेचे समकालीन रूपांतर या मालिकेत करण्यात आले आहे. लग्नानंतर दहा महिन्यांनी वत्सल आणि ईशिता छोटय़ा पडद्यावर एकत्र आले आहेत आणि ते दोघेही या लघुमालिकेमध्ये भाग घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. वत्सल सेठ यांनी यतीन म्हणजेच हिरण्याक्षाचा अवतार साकारला आहे. तर ईशिता वैष्णवीची भूमिका करत आहे. जी एक साधी मुलगी आहे. याविषयी बोलताना, ईशिता म्हणाली, वत्सलने आणि मी मित्र म्हणून याआधी चित्रीकरणात भाग घेतला होता पण आता जास्त उत्सुकता आहे लग्न झालेली एक जोडी म्हणून चित्रीकरण करण्याची. तसंच छोटय़ा पडद्यावर पुन्हा परत येण्यासाठी आणि तेही पत्नी ईशिताबरोबर येण्यासाठी वत्सलही खूपच उत्सुक आहे. तो म्हणाला, ही कथा खूप चांगली असल्यामुळे मला उत्सुकता लागून राहिली आहे. ही एक संतुलित संकल्पना असून त्यात भीती आणि प्रेमाचा योग्य मिलाफ आहे. आम्ही एकत्र चित्रीकरण करायला सुरुवात केली आहे आणि आमच्या व्यक्तिरेखा अतिशय विरोधाभासी आहेत आणि त्यातून गमतीदार भाग निर्माण होतील, अशी खात्री त्या दोघांना आहे.