बधाई हो

आपल्याकडे आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण अशी सगळी नाती अगदी चपखल समीकरणांत बसवलेली असतात. यात प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते, त्या-त्या भूमिकेनुसार त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या चौकटीत वागायचे. जरा या चौकटीबाहेरचे त्यांच्याकडून काही घडले तर समाजातच हाहाकार उडतो. या तमाशाची खरेतर काही गरज नसते. यापलीकडे जात माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे खूप साधेपणाने प्रेक्षकांसमोर ठेवल्याबद्दल दिग्दर्शकाला ‘बधाई’ द्यायला हवी.

अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपट खूपच साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. जीतेंद्र (गजराज राव) आणि प्रियंवदा कौशिकी (नीना गुप्ता) या एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्याच सहजप्रेमाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या या जोडप्याच्या संसारवेलीवर याच प्रेमामुळे तिसरे फूल उमलण्याची वेळ येते. एरव्ही या गोष्टीचा बाऊ  झाला नसता मात्र या जोडप्याचा मोठा मुलगा नकुल (आयुषमान खुराणा) लग्नाच्या वयातला आहे, तर छोटा मुलगाही अडनिडय़ा वयात आहे आणि आता इतक्या उशिरा पुन्हा दिवस राहिलेत म्हटल्यावर ‘वयाचे भान नाही’ इथपासून ते ‘साधे गर्भनिरोधक वापरण्याची अक्कल नाही’पर्यंत अनेक गोष्टींवरून त्यांची खिल्ली उडवली जाते. मुलांसाठीही हा धक्का असतो आणि त्यांच्या आजीसाठीही हा तथाकथित सामाजिक चौकटीचा भंग असतो. अशावेळी खरं म्हणजे काय करायला हवं, कसं वागायला हवं हे कोणालाच कळत नाही. चूक की बरोबर ठरवण्यातच मग्न होणारे आपण त्यांना समजून घ्यायला हवे हेच विसरून जातो.

आई-वडील असले तरी मुळात ते स्त्री-पुरुष आहेत, पती-पत्नी आहेत, त्यांच्यात प्रेमाचे नाते आहे, त्यामुळे शारीरिक सुख घेण्याचा त्यांनाही अधिकार आहेच. पण आई-बाबा असे कसे करू शकतात? हा प्रश्न दिग्दर्शकाने त्यांच्या मुलांच्या तोंडून मांडताना आपण नीतिमत्तेच्या नावाखाली काय गोंधळ घालून ठेवला आहे, याकडे सहज लक्ष वेधले आहे. कुठेही शिकवणुकीचा पवित्रा न घेता पात्रांच्याच तोंडी असलेल्या रोजच्या संवादातून त्यांचे प्रश्न त्यांनाच मांडू दिले आहेत. त्यांनाच त्यांची उत्तरेही मिळतील, इतक्या सहजतेने दिग्दर्शक अमित शर्माने आपला विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.

चित्रपटात नकुलची प्रेयसी रेनी (सन्या मल्होत्रा) त्याला प्रश्न विचारते. आपण जेव्हा इतक्या मोठय़ा मुलांचे आई-वडील असू तेव्हा आपल्यात शारीरिक संबंधच येणार नाहीत का? तशी जर तुझ्या आयुष्याची कल्पना असेल तर मला त्यात रस नाही. तोच मुद्दा मूल ठेवायचे की नाही? या निर्णयाचा अधिकारही यात जीतेंद्र आपल्या पत्नीला देतात.

व्यक्तिरेखांची अचूक बांधणी करून, उगाच शब्दबंबाळ न करता कित्येकदा त्यांच्या चेहऱ्यांवरच्या हावभावातून दिग्दर्शक आपली गोष्ट सहजतेने मांडतो. अर्थात, नीना गुप्ता, गजराज राव, आयुषमान खुराणा यांच्यासारखे तगडे कलाकार असल्याने त्यांनी वरवर साध्या वाटणाऱ्या या विषयाला एक उंची प्राप्त करून दिली आहे. चित्रपटाचे पाश्र्वसंगीतही तितकेच उत्तम आणि कथेला पुढे नेणारे असल्याने अगदी सहज आपल्या आजूबाजूला घडणारी एखादी गोष्ट अनुभवावी अशी भावना हा चित्रपट आपल्याला देतो.

एकूणच आपल्या दैनंदिन जगण्यात अशा अनेक विसंगती आहेत, ज्या लक्षात घेऊन आपण आपलेच नाही तर आपल्याबरोबरच्यांचेही जगणे सुंदर करू शकतो. पण लक्षात कोण घेतो? अशा परिस्थितीत ‘बधाई हो’सारखा अतिशय चांगला बदलत्या काळानुसार कौटुंबिक मूल्ये मांडणारा निखळ चित्रपट पर्वणी ठरतो.

* दिग्दर्शक – अमित रवींद्रनाथ शर्मा

* कलाकार – नीना गुप्ता, गजराज राव, आयुषमान खुराणा, सन्या मल्होत्रा, सुरेखा सिक्री, शीबा चढ्ढा.