छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली. त्यांना तिन मुले आहेत. २०१७मध्ये माही आणि जयने त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेची दोन मुले दत्तक घेतली. त्यानंतर २०१९मध्ये त्यांना मुलगी झाली. गेल्या काही दिवसांपासून जय आणि माहीला मुलगी झाल्यामुळे ट्रोल केले जात आहे. तसेच दत्त घेतलेल्या मुलांना सोडले का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. आता यावर माहीने उत्तर दिले आहे.

काही दिवसापूर्वी माही आणि तिची मुलगी तारा एपोर्टवर दिसल्या होत्या. त्यावेळी माहीसोबत दत्तक घेतलेली मुले खुशी आणि राजवीर दिसत नव्हते. त्यानंतर माही आणि जयला सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले गेले. तुमच्या मुलीच्या जन्मानंतर तुम्ही दत्तक घेतलेल्या मुलांना सोडून दिले का? असा प्रश्न एका यूजरने विचारला होता. तर दुसऱ्या एका युजरने त्यांना मुलगी झाल्यापासून ते दत्तक घेतलेल्या मुलांची काळजी घेत नाहीत असे म्हटले. त्यावर आता माहीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना सुनावले आहे.

माहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पत्र शेअर केले आहे. या पत्रात तिने, ‘तुमच्या पैकी अनेकजण काहीही विचार करत आहे आणि हे फार चुकीचं आहे. हो आम्ही आई-वडील आहोत. देवाच्या कृपेने तारा आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आली. पण तिच्या येण्याने खुशी आणि राजवीरवरचे आमचे प्रेम कमी होणार नाही. जेव्हा खुशी आमच्या आयुष्यात आली तेव्हा मी आई झाले. पण त्यांच्या बाबतील निर्णय घेण्याचा अधिकार केवळ त्यांच्या आई-वडिलांचा आहे’ असे म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली, ‘त्यांच्या आई-वडिलांना वाटत होते की मुंबईमध्ये काही दिवस राहिल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्या गावी यावे. कुटुंबासोबत आणि आजी-आजोबांसोबत वेळ घालवावा. जे लोकं आज मला प्रश्न विचारत आहेत की ते दोघे आमच्यासोबत का दिसत नाहीत किंवा त्या दोघांना आम्ही सोडले का? त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की कृपया असे प्रश्न विचारु नका. या गोष्टीमुळे आम्हाला दु:ख होते. आमची मुलं मोठी झाली की त्यांना देखील या गोष्टीचा त्रास होईल.’