प्रेमात असताना मनाची होणारी तगमग ‘कधी कधी’ या गाण्यामधून प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे. ‘कधी कधी’ गाण्याला गायक रोहित राऊतने आवाज दिला आहे. या गाण्याचे बोल वरुण जैन यांनी रचले आहेत. संगीत अनय नाईक यांचे असून नृत्यदिग्दर्शन नितीन जाधव, अवी नंदू यांनी केले आहे. ‘कधी कधी’ या गाण्याद्वारे अनय नाईक हा मराठी चित्रपटसृष्टीला नव्या दमाचा फ्रेश संगीतकार लाभला आहे. गाण्यामध्ये दिसणारे चेहरे म्हणजे ‘लव्ह लफडे’ करणारी एक नवी जोडी रोहित फाळके आणि रुचिरा जाधव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपट क्षेत्रातील ही जोडी आपल्याला पहिलं प्रेम आणि त्या आठवणी घेऊन जाणार आहे. रोहित फाळकेने आतापर्यंत बी.पी., अव्या, मांजा या चित्रपटांमध्ये काम केले आहे तर रुचिरा ‘प्रेम हे’, ‘तुझ्या वाचून करमेना’, ‘प्रिती परी तुझवरी’, ‘बे दुने दहा’, ‘पती माझे सौभाग्यवती’ अशा विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोबत या सिनेमातही तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

कॉलेज लाईफची धम्माल मस्ती, प्रियकर, पुणेकर, मुंबईकर, सातारकर मित्रांची केमिस्ट्री, लव्ह आणि त्यातील लफडी या सिनेमांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सगळ्या लफड्यांमध्ये त्यांना सुमेध गायकवाड हा लव्ह गुरूही भेटणार आहे. या लव्ह गुरूच्या येण्याने रोहित रुचिराच्या आयुष्यात काय बदल होणार हे सचिन आंबात दिग्दर्शित, संजय मोरे लिखित “लव्ह लफडे” चित्रपटात लवकरच पाहायला मिळणार आहे.