दिलीप ठाकूर रिमेकची प्रथा जगभर चालणारी. एका भाषेतील चित्रपटातील चांगली गोष्ट कोणी अधिकृतपणे (रितसर करारानुसार) तर कोणी अनधिकृतपणे (त्याला गोंडस नाव प्रभावित होणे) दुसर्या भाषेतील चित्रपटात साकारतात. मराठी चित्रपट तर कसदार कथांसाठी ओळखला जातो. म्हणून तर मराठी चित्रपटावरुन हिंदीत रिमेक ही खूपच जुनी परंपरा. असाच एक पन्नास वर्षांपूर्वीचा प्रेम चित्र बॅनरच्या 'आम्ही जातो अमुच्या गावा' (१९६८) वरुनचा 'तीन चोर' (१९७३). ‘आम्ही जातो.’ची कथा पटकथा व संवाद मधुसूदन कालेलकर यांचे तर निर्मिती व दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांचे! सहकुटुंब पाहण्याजोगे स्वच्छ मनोरंजन हे कमलाकर तोरणे यांच्या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य होय. यातही तेच वैशिष्ट्य पाह्यला मिळते. तीन चोर (सूर्यकांत, धुमाळ व गणेश सोळंकी) एका जेलमधून पळतात आणि योगायोगाने एका प्रशस्त घरात आश्रय घेतात. त्या घराच्या कुटुंबप्रमुखाला (रामचंद्र वर्दे) वाटते हे आपल्या घरात ते कामासाठी आले आहेत. या घरात काही दिवस लपण्याची संधी मिळेल, पोलिसांचा ससेमिरा चुकवता येईल आणि काही महिन्यांनी येथेही चोरी करून पळून जाऊ असा या चोरांचा मानस असतो. पण या कुटुंबातील चांगुलपणा व माणुसकी या चोरांचे ह्रदयपरिवर्तंन करते. या तिघांचाही या कुटुंबाला लळा लागतो. घरातील मुलीला ( उमा) प्रेमप्रकरणात हे मदत करतात. तिच्या प्रियकराशी (श्रीकांत मोघे) भेट घडवून आणतात वगैरे वगैरे. अर्थात अखेरीस त्या चोरांचे बिंग फुटतेचं. चित्रपटाने घवघवीत यश मिळवताच याच गोष्टीवर हिंदीत रिमेक करावासा वाटणे स्वाभाविक होतेच. एव्हाना या हिंदी चित्रपटाचे नाव 'तीन चोर' का याचे उत्तर तुम्हाला मिळालेच. हिंदीत या चोरांच्या भूमिकेत आय. एस. जोहर, जीवन आणि ओमप्रकाश असे मराठीसारखेच तगडे कलाकार होते. प्रत्येकाची अभिनय शैली भिन्न. प्रेमिकांच्या भूमिकेत विनोद मेहरा व जाहिदा होते. इतर भूमिकेत सुलोचनादीदी, सुंदर, रणजित, जगदीश राज इत्यादी होते. दिग्दर्शन दादा मिराशी यांचे होते. पण मूळ गोष्टीत भावनिकपणा व विनोद यांचा जसा छान मेळ बसला तसा हिंदीत रंग व गंमत आली नाही. याची कारणे काय बरे? मूळ गोष्टीत कौटुंबिक चित्रपट याचे भान कधीच सुटले नाही. हिंदीत नदीतील पाण्यात नायिकेचे डुबंणे, मग कधी खलनायकाकडून तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न (रणजीतचे नाव वाचल्यावर ते तुमच्या लक्षात आलेही असेल म्हणा), तसेच मारधाड वगैरे होते. हिंदीतील मसाला चित्रपट असे स्वरूप आल्याने 'तीन चोर' 'आम्ही जातो अमुच्या गावा' होऊ शकला नाही. तात्पर्य, रिमेक करताना मूळ गोष्टीची ताकद कशात आहे हे व्यवस्थित जाणून घ्यायला हवे. 'आम्ही जातो.'मधील ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता’ (गायक व संगीतकार सुधीर फडके. गीतकार जगदीश खेबुडकर) हे भक्तीगीत आज पन्नास वर्षांनंतरही लोकप्रिय आहे. तसे 'तीन चोर'चे एकही गाणे ( संगीत सोनिक ओमी) गाणे श्रवणीय होऊ शकले नाही. मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक कसदार असावा हीच अपेक्षा. याला काही अपवाद जरूर आहेत.