बॉलिवूड म्हटलं की कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाईफविषयीच्या चर्चा हमखास चाहत्यांमध्ये रंगत असतात. त्यामुळे कलाविश्वातील अनेक प्रसिद्ध जोडप्यांच्या लग्नाचे, प्रेमाचे किस्से चाहत्यांना माहित असतील. मात्र ज्यावेळी हे सेलिब्रिटी स्वत: हून त्यांच्या लव्हलाइफ किंवा मॅरेज लाइफमधील किस्से सांगतात तेव्हा खरी पर्वणी असते. यामध्येच आज चर्चा होत आहे, ती बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाची. आज या दोघांच्या लग्नाचा ४७ वा वाढदिवस असून या खास दिवशी बिग बींनी एक खास फोटो शेअर करत जुन्या आठवणी जागवल्या आहेत.

बिग बी आणि जया बच्चन यांनी ३ जून रोजी लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न कशा पद्धतीने झालं हा रंजक किस्सा तर साऱ्यांनाच ठावूक असेल. मात्र आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे बिग बींनी लग्नामंडपातील एक फोटो शेअर करत रंजक किस्सा सांगितला. सोबतच जया बच्चन यांना शुभेच्छाही दिल्या.

शेअर केलेल्या फोटोमध्ये जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे लग्नाचे विविध करत आहेत. “४७ वर्ष…आजच्याच दिवशी..३ जून १९७३., असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. पुढे ते लिहितात. त्याकाळी जंजीर सुपरहिट ठरल्यावर लंडनला जायचं असा चंग आम्ही मित्रपरिवाराने बांधला होता. तेव्हा तू कोणासोबत जाणार आहेस असा प्रश्न वडिलांनी मला विचारला होता. त्यावर तू जिच्यासोबत जायचं असेल तर प्रथम तिच्यासोबत लग्न करावं लागेल. नाही तर तुला जाता येणार नाही..आणि काय..मी त्या आज्ञेचं पालन केलं”. दरम्यान, सध्या बिग बींच्या या फोटोची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे.