अभिनेता अर्जुन कपूरला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकतीच एक नोटीस पाठविण्यात आली आहे. जुहू येथील राहत्या घरी अवैध बांधकाम केल्याप्रकरणी त्याला ही नोटीस पाठविण्यात आली असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटरद्वारे ट्विट करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या म्हणण्यानुसार अर्जुनने त्याच्या जुहू येथील घराच्या गच्चीवर कोणत्याही परवानगीशिवाय ३०`१६ फुट इतक्या मापाच्या एका खोलीचे बांधकाम करत त्याच जागेवर अतिक्रमण केले आहे. पण, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी अर्जुन आणि त्याच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी मेसेज किंवा दूरध्वनीचे उत्तर न देता सदर प्रकरणी मौन पाळले आहे असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

अर्जुन कपूर सध्या जुहू येथील रहेजा ऑर्किड या इमारतीत ७ व्या मजल्यावर राहतो. दरम्यान, या इमारतीतील कोणत्याही रहिवाशांनी महानगरपालिकेकडे तक्रार केलेली नाही, तर त्या इमारतीबाहेरील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबईकडे या अवैध बांधकामाबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पालिकेल्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीबद्दल तपास केला.

दरम्यान, मार्च महिन्यात या प्रकरणी पहिली नोटीस अर्जुनला पाठविण्यात आली होती. हे अवैध बांधकाम पाडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांन त्याच्या मालमत्तेमध्ये प्रवेश देण्यात यावा अशी दुसरी नोटीसही अर्जुनला पाठविण्यात आली होती. आज त्याला अजून एक नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता या तिसऱ्या नोटीसनंतर पालिका थेट कारवाई करण्याच्याच तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.

अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘मुबारकाँ’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात अर्जुन आणि अभिनेता अनिल कपूर अशी काका-पुतण्याची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अर्जुन आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण, म्हणजे मलायका अरोरा आणि त्याची वाढती मैत्री. अरबाज आणि मलायका विभक्त होण्याच्या निर्णयामध्ये अरबाज-मलायकामध्ये तिसरा व्यक्ती आल्याची चर्चा रंगत होती. बॉलिवूडची ही जोडी फुटण्यामागे अर्जुन कपूर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुनसोबत मलायका अरोरा खानमधील वाढत्या मैत्रीमुळे ती अरबाजपासून दूर होत असल्याचे वृत्तही सध्या चर्चेत आहे.