राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील एक असं नाव आहे जे वादग्रस्त कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतं. राम गोपाल वर्मा अनेकदा अशी काही वक्तव्य करतो ज्यामुळे वादाला तोंड फुटतं. मात्र हे नाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे गाजत आहे. त्यांनी चक्क ३७ वर्षांनंतर आपली इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. स्वतः त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक ज्यांनी 'रंगीला', 'सत्या', 'दौड', यांसारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरवात दक्षिणेतून केली आहे. त्याआधी पेशाने ते इंजिनियर आहेत. नुकतीच त्यांनी कॉलेजमधून पदवी घेतली आहे. आपल्या पदवीचा फोटो शेअर करत म्हणाले, "उत्तीर्ण झाल्यानंतर ३७ वर्षांनी आज माझी बी टेक पदवी मिळाल्याने खूप आनंद झाला, जी मी १९८५ मध्ये घेतली नाही कारण मला सिव्हिल इंजिनीअरिंग पुढे चालू ठेवण्यास रस नव्हता." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 'आचार्य नागार्जुना' या युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी घेतली आहे. राम गोपाल वर्मा मूळचे तेलगू भाषिक आहेत. इंजियनरींग करता असताना त्यांचा ओढा हा कायम चित्रपटांकडे होता. त्यांनी बी गोपाळ यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामदेखील केले. मात्र त्यानंतर ते स्वतंत्रपणे दिग्दर्शन करू लागले. बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांना त्यांनी कायमच संधी दिली आहे. मनोज वाजपेयी, उर्मिला मातोंडकर, अनुराग कश्यप अशा कलाकरांना त्यांनी संधी दिली आहे.