अभिनेते व नेते किरण माने यांची उद्धव ठाकरेंबद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ केलं नाही, असं म्हटलंय. तसेच राजकारणात पवारसाहेब, राहुल गांधी, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते, असंही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ नाही केले! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले.
समजा एखादा अभिनेता महान आहे.. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब दिसणार्‍या कलाकाराला देतात का? नाही. गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.
… बाळासाहेबांचं नांव ‘कॅश’ करणं उद्धवजींना अवघड नव्हतं. “माझ्या उद्धवला सांभाळा” ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं.
आपण नेहमी म्हणतो बघा. ‘आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.’
….तसंच आज जे बाळासाहेबांचं नाव ‘वापरणार्‍यांनी’ही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.
बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नावाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.
आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काँग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काँग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते.
आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. ‘जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची’, हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय.
हे बघा… तो त्याच्या बापाचं नाव लावतो. उसन्या बापाची गरज नाही त्याला. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाम ही काफी है,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘काही युत्या आघाड्या निवडणुकी पलीकडे असतात,’ ‘आता राजकारण एवढं गचाळ झालं आहे की देश कुठे जाणार कळत नाही आहे.. पणं म्हणून नरेंद्र मोदी वाईट आणि इंडी वाले सर्व चांगले असं पणं नाही होत… सर्व एका माळेचे मणी..’ अशा कमेंट्स युजर्सनी या पोस्टवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane post for uddhav thackeray balasaheb thackeray hindutva hrc
Show comments