तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. यामध्ये आता आणखी भर पडली असून राखी सावंत हिने या विषयात उडी घेतली आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं नुकताच एका मुलाखतीत केला होता. मात्र झाल्याप्रकाराविषयी राखीने वेगळीच गोष्ट समोर आणली आहे. या चित्रपटादरम्यान घडलेल्या गोष्टींनंतर तनुश्रीचे गाणे मी शूट केले होते असे सांगत राखीने नेमके काय घडले ते सांगितले.

ज्या गाण्यात तनुश्री होती ते गाणे ऐनवेळी मी शूट केले असे राखीने सांगितले. यामागचे कारण सांगताना ती म्हणाली, मला एक दिवस अचानक गणेश आचार्य यांचा फोन आला. त्यांनी मला त्वरीत सेटवर येण्यासाठी सांगितले. मी त्यांना बाकी तपशील विचारले असता त्यांनी मला आपण एक गाणे बसवतोय तर तु ये इतकेच सांगितले. त्यांच्या शब्दाचा मान राखून मी सेटवर गेलेही. मात्र तिथे गेल्यानंतर समोर आलेली परिस्थिती फारच वेगळी होती.

सेटजवळ एक मेकअप व्हॅन उभी होती. मात्र, त्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. मी घाबरून हा काय प्रकार आहे असे आचार्य यांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, तनुश्री या गाण्यात नाचणार होती. आम्ही गाण्याचा काही भाग शुटही केला होता. मात्र, गेल्या चार-पाच तासांपासून ती व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडायला तयार नाही. सेटवरील अनेक जण तिला बाहेर येण्याची विनंती करत होते मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळी तिथे असलेल्या एका मेकअप आर्टिस्टने तनुश्रीने ड्रग्ज घेतल्याचे सांगितले. त्यामुळे तनुश्री बेशुद्ध पडली होती असेही राखी म्हणाली. त्यामुळे राखी सावंतने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.