भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने सोशल मीडियावर धक्कादायक पोस्ट केली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच तिने आत्महत्या करण्यासंबंधी देखील पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच तिने या सर्वाला एका नेटकऱ्याला जबाबदार ठरवले आहे.

राणी चॅटर्जीने फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, ‘मी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये आहे. मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता मी सकारात्मक वागू शकत नाही. एक व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून माझ्याबाबतील आक्षेपार्ह गोष्टी फेसबुकवर लिहित आहे. मी या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मी या विषयावर अनेकांशी बोलले. त्यांनीही मला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. पण मी एक माणूस आहे. मी या गोष्टीमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून मानसिक तणावाचा सामना करत आहे. बहुतेक मी जीव द्यावा असे या व्यक्तीला वाटत आहे’ असे म्हटले आहे.

‘माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की जर मी माझ्या जीवाचे काही बरे वाईट केले तर त्यासाठी धनंजय सिंह ही व्यक्ती जबाबदार असेल. मी सायबर सेलमध्येही त्याची तक्रार केली, पण त्याने माझे नाव लिहिले नाही असे त्यांनी मला सांगितले. पण मला माहित आहे हा व्यक्ती फक्त माझ्यासाठी लिहित असतो. आता या व्यक्तीमुळे मी आणखी सहन करु शकत नाही, आत्महत्या करण्याचे विचार माझ्या डोक्यात येत आहेत, कारण या सर्वामुळे मी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये आहे. आता मला आणखी सहन होत नाही’ असे तिने पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे.