मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर येथे शिक्षिकेच्या हत्येप्रकरणी सहावीतील विद्यार्थ्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या आयेशा अस्लम हुसईये (वय ३०) यांच्याकडे हा मुलगा  तीन वर्षांपासून खासगी शिकवणीसाठी येत होता. आयेशा ज्या शाळेत शिकवत होत्या तेथेच हा मुलगाही शिकत होता. मात्र स्वभावाने शांत असलेल्या या मुलाने आपल्या शिक्षिकेचीच हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.

आयेशा ज्या शाळेत शिक्षिका होत्या, ती शाळा त्यांच्या वडिलांनीच बांधली असून त्यांची सावत्र आई ही शाळा चालवते. वडिलांचे तीन विवाह असल्याने मालमत्तेच्या वादातून  ही हत्या घडवून आणली असावी असा संशय काही रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे. आयेशा यांच्यावर एवढा लहान मुलगा आठ वार  कसे करू शकतो, असे प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. मात्र या हत्येची मुलाने कबुली दिली असूनअन्य बाबींचाही  तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वनाथ भुजबळ यांनी दिली.