मुंबई : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री घाटकोपर परिसरात उघडकीला आला. याबाबत पंतनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. नितेश सावंत असे या मृत तरुणाचे नाव असून तो घाटकोपरच्या गौरीशंकर वाडी परिसरात राहत होता. शनिवारी त्याचा वाढदिवस असल्याने काही मित्रांनी रविवारी साईबाबा मंदिर परिसरात पार्टी आयोजित केली होती. याच वेळी दारूच्या नशेत असलेल्या काही जणांमध्ये पूर्वीच्या भांडणावरून पुन्हा वाद झाला. या वादाची परिणती जोरदार हाणामारी होण्यात झाली. यावेळी बाबू केंडे, संकेत खरात आणि त्यांच्या इतर पाच साथीदारांनी नितेशवर चाकु आणि काचेच्या बाटल्यांनी जोरदार हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या काही मित्रांनी त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पंतनगर पोलिसांनी  गुन्हा दाखल करत, सातही आरोपींना अटक केली आहे.