मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबई महापालिकेने दोन हजार इमारतींनाच भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिले आहे. तर तब्बल ५६ हजार इमारतींना अद्याप ओसी मिळाले नसल्याची महिती समोर आली आहे.  एखाद्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा ताबा घेण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बंधणकारक आहे. ओसी न घेताच विकासक पळ काढत असून पैसे गुंतविल्याने रहिवाशी नाइलाजाने बेकायदेशीरपणे इमारतींमध्ये वास्तव्य करतात.

नुकतेच परळ येथीलल क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. क्रिस्टल टॉवरला २०१६ मध्ये इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओसी प्रमाणपत्राचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील ५६ हजार इमारतीना अद्याप ओसी प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुंबईतील लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील तब्बल ५६ हजार इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्र नाही. नियमानुसार ओसी नसतानाही वास्तव्य केल्यास त्या इमारतीतील रहिवाशांवर खटला दाखल करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. मात्र ओसी नसलेल्या इमारतींचे प्रमाण अधिक असल्याने त्यावर कारवाई करणे महापालिकेसाठी कठीण झाले आहे.