ठाकरे आणि राणे या कुटुंबातील राजकीय वाद हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवीन विषय नाही. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पूर्वाश्रमीची मॅनेजर दिशा सालियन या दोघांच्या मृत्यूप्रकरणी भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश व निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विविध आरोप केले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा खळबळजनक आरोपही नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता नितेश राणे यांनी 'दिशा' शब्दावरून आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधल्याची चर्चा आहे. "महाराष्ट्र सरकार शक्ती नावाचा नवा कायदा आणत आहे हे ऐकून मला आनंद झाला. या कायद्याचं आधीचं नाव दिशा होतं पण ते बदलून शक्ती ठेवण्यात आलं. कायद्याचं आधीचं नाव 'दिशा' होतं ते काय बदललं हे समजू शकतो", असं खोचक टोला नितेश राणेंनी लगावला. "आपले राज्य या कायद्याअंतर्गत कारवाई करताना कोणत्याही खटल्यात भेदभाव करणार नाही अशी मला आशा आहे. अगदी युवा कॅबिनेट मंत्री, जे सध्या एक संशयित आहेत, त्यांच्यासंदर्भात जरी खटला असेल तरी त्याचा निकाल निपक्षपातीपणे दिला जाईल अशी माझी अपेक्षा आहे", असं म्हणत त्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवल्याचं बोलल जात आहे. I m glad Maha Gov is bringing a new law called ‘Shakti’.The name of the law was changed from “Disha” to “Shakti” for obv reasons..Hope the state is not selective abt choosing cases..every case shud be dealt in fair manner even if a young cabinet minister is 1 of the suspects! — nitesh rane (@NiteshNRane) December 10, 2020 महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची तरतूद असलेला कायदा आणला असून या नव्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात त्यासाठीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. या कायद्याअंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यात पंधरा दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या परवानगीने त्यात फार तर पाच दिवसांची सवलत देण्यात येईल. या कायद्याचं नाव 'शक्ती' असं ठेवण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी ट्विट केलं.