शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर ईडीकडून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात होण्याच्या काळातच हा गुन्हा दाखल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बाजू मांडली आहे. जर बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झालेला असेल, तर ती बँक अडीचशे ते तीनशे कोटींचा नफा कशी कमावते,” असा उलट सवाल अजित पवार यांनी केला आहे.

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवरही ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, “शिखर बँकेच्या कोणत्याही पदावर शरद पवार नव्हते. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माध्यमातून वृत्त आल्यानंतरच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मला कोणावरही आरोप करायचा नाही. यंत्रणांना तपास करण्याचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना म्हणणं मांडायला वेळ द्यायला हवा ना?” असं अजित पवार म्हणाले.

बँकेतील घोटाळा आणि अनियमिततेविषयी बोलताना पवार म्हणाले, “बँकेच्या कारभारात अनियमितता झाली असेल, तर ती काय झाली हे सांगायला हवं. बँक अडचणी यावी, असे निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आले का ते सांगाव. तुम्ही बँकेच्या अमुक बैठकीला हजर होता, असं दाखवून द्यायला हवं. आम्ही आमची बाजू मांडू. बँकेच्या कारभारात राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेतकरी कामगार पक्ष अशा सर्वच पक्षाचे नेते आहेत. आरोप असलेले 70 लोक खोटं नाही ना बोलणार? शिखर बँकेत 12 ते 13 हजार कोटींच्या ठेवी आहेत. जर ठेवी जर 13 हजार कोटींपर्यंत असतील, तर 25 हजार कोटींचा घोटाळा कसा होतो. एवढा मोठा घोटाळा होऊन बँक सुस्थित कशी राहते. घोटाळा झाल्यानंतरही बँक 250 ते 300 कोटींचा नफा कशी कमावते आहे. ,” असा प्रश्न अजित पवार यांनी केला.