मर्सडिीज, ऑडी, बीएमडब्लू, डॉज अशा श्रीमंती झगमगाटात सायकल हे वाहन अंग चोरून उभे असते, असे आपल्याला वाटते. परंतु भपकेबाज श्रीमंतीपुढे सायकलचा धट्टाकट्टा साधेपणा आजही लोकांना भावतो. जगभरात इतर वाहनांच्या तुलनेत सायकलची मागणी कैक पटीने वाढत आहे. चीन, जपान, नॉर्वे, स्वीडन, स्विट्र्झलड, नेदरलॅण्ड्स ही जगातील प्रगत राष्ट्रे सायकलचे देश (सायकिलग कंट्रीज) म्हणून ओळखली जातात. हा सर्वार्थाने सायकलचा बहुमान आहे.
सायकल हे फक्त वाहन नाही, तर तो एक विचार आहे. मानवी जीवन व्यवहाराशी निगडित अशी उन्नत संकल्पना आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वाहतूक ही माणसाची मूलभूत गरज पूर्ण करण्याची जबाबदारी सायकल यशस्वीपणे पार पाडते, हे तर आपण जाणतोच. पण सायकल उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन माणसाला प्रवासमग्न करते; त्याला-तिला निखळ आनंद देते. ‘बोलावतो सोसाटय़ाचा वारा मला रसपाना’ असा सुंदर अनुभव देण्याची ताकद साध्यासुध्या सायकलमध्ये आहे. निसर्गाशी प्रामाणिक राहण्याची शपथ सायकलच घेऊ शकते, आलिशान लॅम्बोíगनी नाही.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जगभरात सायकल संस्कृतीचा भरपूर अभ्यास सुरू आहे. यातून सायकलचा एक व्यापक सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज तयार होत आहे. अनेक जाणकारांच्या मते, मुंबई हे सायकल शहर म्हणून भरभराटीस येऊ शकते. गेल्या वर्ष-दोन वर्षांत मुंबईच्या उपनगरात रविवारी सकाळी पाच तास सायकलसाठी राखून ठेवण्याची नावीन्यपूर्ण मोहीम सुरू झाली आहे. आणि तिला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून एखाद्या चकचकित इम्पालाला दरदरून घाम फुटू शकतो.
जागतिक आकडेवारीनुसार १९६०च्या दशकात सायकल आणि चारचाकी (कार) यांच्या निर्मितीत फार अंतर नव्हते. गेल्या चाळीस वर्षांत मात्र हे चित्र बदलले आहे. सध्या सायकल आणि चारचाकींच्या उत्पादनाचे प्रमाण ३:१ असे आहे. अमेरिका हा श्रीमंताचा देश असल्यामुळे तिथे सायकल उत्पादनात घट होत असली तरीही युरोपने मात्र सायकलशी आपली मत्री कायम ठेवली आहे. आशिया खंडात सायकलला जोरदार मागणी आहे, असे अद्ययावत आकडे सांगतात. एकटय़ा चीनमध्ये दरवर्षी चार कोटी सायकल तयार केल्या जातात.
भारतातल्या सायकल उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. आपल्याकडे दरवर्षी दीड कोटी सायकलचे उत्पादन केले जाते. साध्या सायकलला फारशी मागणी नसली तरीही सुसज्ज आणि अत्याधुनिक सायकलची लोकप्रियता सतत वाढत आहे. भारतातील हिरो, अ‍ॅटलस, टीआय सायकल्स अशा नामांकित कंपन्यांनी परदेशी सायकल कंपन्यांशी वितरणाचे करार केले आहेत, हे विशेष. गेल्या काही वर्षांत महाविद्यालयीन आणि आयटी-आयआयटीतील युवक-युवती आणि चाळिशी गाठलेले मध्यवयीन नागरिक सायकल पर्यटनाच्या प्रेमात पडले आहेत. देशाच्या लेह-लडाख, आसाम-आगरतळा किंवा कुलू-मनाली अशा मनोरम किंवा दुर्गम भागांची सायकल रपेट करण्याचा शौक असल्यामुळे सायकलकडे लोकांचा ओढा वाढला आहे. डोंगराळ किंवा खडकाळ भागांत प्रवास करण्यासाठी म्हणून विशेष सायकल तयार केली जाते. अशी सायकल निसर्ग आणि देश-प्रदेश डिस्कव्हर (शोध) करण्याची इच्छा पूर्ण करते. सायकलप्रेमींची पथके दरवर्षी मोठय़ा उत्साहाने दुर्गम-अतिदुर्गम किंवा पहाडी प्रदेशांच्या दौऱ्यास मोठय़ा उत्साहाने निघतात. या मंडळींचा सायकल पर्यटनाचा आनंद दिवसागणिक वाढतोच आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.
जगभरातली सायकल विषयातील घडामोडींची इतकी सविस्तर चर्चा करण्याचे कारण म्हणजे मुंबईची जटिल वाहतूक व्यवस्था, गाडय़ांची बेसुमार गर्दी आणि वाढते प्रदूषण या मुंबईच्या दोन समस्यांना पंक्चर करण्याचे काम सायकल सहजपणे करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. घरून स्टेशन किंवा भाजीबाजार अशा तोकडय़ा अंतरांसाठी ऑटोरिक्षा घेण्याचे खरे तर काहीच कारण नाही. घरात एक सायकल असली की पुरे. आजही मुंबईतली अनेक शाळकरी मुले-मुली सायकलीवरून शाळेत जातात. रस्त्यावर दहा-बारा शाळकरी मुले सायकलीवरून शाळेच्या दिशेने निघाली आहेत, हे दृश्य मनाला दिलासा देणारे आहे. मुंबईतल्या प्रौढांनी मुलांचे याबाबतीत अनुकरण केले तर प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांना आपोआपच ब्रेक लागेल. पण हे कधी होईल?
यासाठी मुंबईसारख्या महानगरात सायकल संस्कृती रुजवणे आणि जोपासणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिका प्रशासनाने आणि सरकारने सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. परंतु त्यासाठी मुळात सायकलच्या फेऱ्या आणि संख्या यांत मोठी वाढ झाली पाहिजे. तसे झाल्यास महापालिकेला आपल्या वार्षकि अर्थसंकल्पात सायकलस्नेही तरतूद करता येईल. दुसरे, मुख्य रस्ता आणि महामार्गावर चारचाक्यांचा उपयोग होत असतो, परंतु शहराच्या अंतर्गत, एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी किंवा उपनगरांबद्दल बोलायचे झाल्यास एका गावठाण्यातून दुसऱ्या गावठाण्यात जाण्यासाठी सायकलचा उपयोग करण्यावर भर दिला पाहिजे. तरच सायकल संस्कृती रुजण्यास आणि फोफावण्यास मदत होईल. तिसरे, सायकलशी संबंधित सार्वजनिक कार्यक्रम राबविले गेले पाहिजे. सायकल रॅली किंवा सायकल प्रसाराचे उपक्रम मोठय़ा प्रमाणात झाले पाहिजेत.
सध्याच्या भीषण दुष्काळामुळे लोकांना पाण्याचे महत्त्व कळले आहे; समाजात जलसाक्षरता वाढते आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण, इंधनाची तीव्र टंचाई आणि तिच्यावर होणारा खर्च, रस्तेबांधणी-दुरुस्ती यांवर होणारा अवाढव्य खर्च या सगळ्या समस्यांचे सायकल हे सोपे उत्तर आहे. यासाठी समाजात सायकल साक्षरता रुजणे गरजेचे आहे. मुंबईत फायद्याचा वादा लोकांना पटकन कळतो. सायकलचेही अनेक फायदे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माणसाचे आरोग्य. रोज सायकलवर किमान तासभर रपेट केली की, साधारण ६०० कॅलेरीज जळण्यास मदत होते.
‘यह सायकल बडी नामी चीज हैं!’

– विवेक सुर्वे