शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळमधील बीआयटी चाळीला भेट दिली. बीआयटी चाळ येथील एका इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनेक वर्षे वास्तव्यास होते. या घरालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्माण दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शुक्रवारी मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली. १९१२ ते १९३४ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी वास्तव्यास होते. यापूर्वी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.

यासंदर्भात आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील अने वर्षे या निवास्थानी व्यतीत केली. त्यांनी वृत्तपत्राची सुरूवातही इथूनच केली, मनुस्मृती जाळायलादेखील ते इथूनच गेले, ज्या ठिकाणाहून ते गोल्मेज परिषदेला गेले, ज्या ठिकाणी त्यांची छत्रपती शाहू महाराजांनी भेट घेतली, अशा बीआयटी चाळीचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.