मुंबई : मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये राज्य सरकारने नऊ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून त्यामुळे ११०० हून अधिक गुन्ह्य़ाची उकल करण्यास मदत झाली आहे. मुंबईत सीसीटीव्हीमुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या सात लाख नागरिकांना तर पुण्यात १४ लाख जणांना ई चलनाद्वारे दंड करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग होत असल्याची माहिती गृह खात्याने दिली आहे.

मुंबईत १५१० ठिकाणी सुमारे पाच हजार तर पुण्यात ४२५ ठिकाणी १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. सिग्नल तोडण्यासह अन्य वाहतूक नियमांच्या भंगासाठी ई चलनाद्वारे दंड करण्यात येत आहे. पुण्यात २१६ गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरणाचा उपयोग झाला आहे. मुंबईत आणखी ५,६२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई-पुण्यात सीसीटीव्ही यंत्रणेमुळे ९७२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीमुळे उत्सव, मोर्चे, आंदोलने, अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, निवडणुका इत्यादी घटनांचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य झाले आहे, असे गृह विभागातर्फे सांगण्यात आले.