मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चिंचपोकळी स्थानकावर रेल्वे रुळांना तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. धिम्या गतीच्या लोकल गाड्यांची वाहतूक करणाऱ्या रेल्वे रुळांना तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ८ ते १० या वेळात मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये मोठी गर्दी असते. लोक मोठ्या संख्येने या वेळेत कार्यालयांमध्ये जाण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे सकाळची वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मात्र याच वेळेत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. दिवसाची सुरुवातच रेल्वेच्या खोळंब्याने झाल्याने शेकडो नोकरदारांना लेटमार्कला सामोरे जावे लागणार आहे.