मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्याची महाराष्ट्रातील जनतेची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. मुंबईतील विमानतळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जात होता. यापुढे हा विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जाईल. मूळ नावात ‘महाराज’ हे शब्द जोडण्यात आले आहेत.

नावात केलेल्या बदलामुळे महाराजांचा खऱ्या अर्थाने सन्मान वाढला आहे. या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुकवरील संदेशात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाने ओळखला जाईल. बऱ्याच वर्षांपासूनची मागणी मान्य झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो असे सुरेश प्रभू यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.