पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे माहुलच्या पर्यायी घरात जाता येत नाही आणि प्रशासन मूळ घराच्या आसपास तात्पुरते पर्यायी घर देत नाही, अशा कोंडीत सापडलेल्या शीव कोळीवाडय़ातील दोन इमारतींमध्ये ४० स्वच्छता कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. दुरुस्तीनंतर इमारती भक्कम होऊ शकतात. मात्र कामगारांना त्याच भागात पर्यायी घर देण्याबाबत पालिका प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे या दोन्ही इमारती अतिधोकादायक इमारतींच्या मार्गावर आहेत. हेमंत मांजरेकर मार्गावर पालिकेच्या सेवानिवासस्थानाच्या दोन इमारती असून या इमारतींमध्ये प्रत्येकी २० अशी एकूण ४० सफाई कामगारांची कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. सफाई कामगार भल्या पहाटे उठून पालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणाची साफसफाई करण्यासाठी निघून जातात. हे ठिकाणी कामगारांच्या घरापासून जवळ आहे. त्यामुळे बसगाडीने अथवा रेल्वेने तेथे पोहोचणे कामगारांना सहज शक्य होते. सफाई कामगारांची मुले याच भागातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. रुग्णालय, दवाखाना, बाजारपेठ आदी घराच्या आसपास असल्यामुळे या कुटुंबांना सर्व सुविधा सहजगत्या प्राप्त होतात.या सेवानिवासस्थानातील दोन्ही इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. या इमारतींची दुरुस्ती केल्यानंतर त्या भक्कम होतील असा निष्कर्ष संरचनात्मक तपासणीत काढण्यात आला आणि त्या ‘सी-२’ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या. या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला. मात्र कोळीवाडय़ाच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखणाऱ्या या सफाई कामगारांना माहुल येथे तात्पुरत्या वास्तव्यासाठी पर्यायी घर देण्यात आले. माहुल येथे पोहोचण्यासाठी साधारण अध्र्या तासाच्या अंतरावर असलेले कुर्ला वा चेंबूर स्थानक गाठावे लागते. त्यापुढे बस वा खिशाला खार लावून रिक्षा पकडून माहुल गाठावे लागते. भल्या पहाटे साफसफाईसाठी नियोजित ठिकाणी माहुल येथून पोहोचणे सफाई कामगारांना शक्य होत नाही. तसेच शाळा, दवाखाना, रुग्णालय, उद्यान, मैदान, दळणवळणाची साधने आदी विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे सफाई कामगारांनी तेथे जाण्यास नकार दिला. गेल्या महिन्यातील मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर मुंबईत इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या आणि त्यानंतर पालिका प्रशासनाने अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांवर नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. रहिवाशी स्थलांतर करीत नसल्यामुळे अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचाही प्रशासनाचा विचार आहे. कोळीवाडय़ाच्या जवळच्या दोन संक्रमण शिबिरांमध्ये काही गाळे रिकामे आहेत. तेथे या सफाई कामगारांच्या निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकते. या संक्रमण शिबिरांमधील निवासस्थानांमध्ये काही मंडळींनी घुसखोरी केली आहे. त्यांना बाहेर काढण्यात पालिका अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. तर दुसरीकडे या सफाई कामगारांची माहुलला रवानगी करण्याचा प्रशासनाचा अट्टहास आहे. -मंगेश सातमकर, शिवसेना नगरसेवक