गाव तिथे काँग्रेस : बाळासाहेब थोरात यांची घोषणा

मुंबई : अनपेक्षितपणे राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळालेल्या काँग्रेसला आता नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘गाव तिथे काँग्रेस’ अभियानाची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी  केली. या अभियानाच्या काळात राज्यात ४० हजार ग्राम काँग्रेस समित्या स्थापन करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

दादर येथील टिळक भवन या प्रदेश काँग्रेस मुख्यालयात बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे  जिल्हाध्यक्ष व विविध आघाडय़ांचे प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यात पक्षवाढीसाठी व बळकटीसाठी कंबर कसून सर्वानी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात गाव तिथे काँग्रेस हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. तीन महिने चालणाऱ्या या अभियानांतर्गत राज्यात ४० हजार ग्राम काँग्रेस समित्या स्थापन करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.