दिवा रेल्वे स्थानकालगत असलेल्या मार्गावर उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर शुक्रवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने उतरविल्याने संतापलेल्या त्यांच्या अनुयायांनी या मार्गावरील धीमी वाहतूक तब्बल दीड तास रोखून धरली. दादरच्या चैत्यभूमीकडे निघालेल्या दिव्यातील अनुयायांनी हे बॅनर उतरविणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत वाद घातला. त्यामुळे दिवा स्थानकात तणाव निर्माण झाला होता.  या आंदोलनामुळे सकाळच्या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते दिवा दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने या मार्गावरील दहा लोकल रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने जमावा विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी रात्री उशीरापर्यत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.