इस्वलकर यांची मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंवर टीका कालपर्यंत गिरणी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे म्हणून दंड थोपटणारी भाजप व शिवसेना सत्तेत येऊन वर्ष उलटल्यानंतरही १,४८,८६७ गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यास तयार नाहीत. गिरणी कामगार आज उपाशी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे केवळ सत्तेचे लोणी खाण्यात मग्न असल्याचा आरोप गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर नवीन वर्षांत गिरणी कामगारांच्या घरांसाठी लढा देण्यात येणार असल्याचे दत्ता इस्वलकर यांनी सांगितले. काही हजार कामगारांना घरे देऊन कालपर्यंत आघाडी सरकारने तोंडाला पाने पुसली होती. त्या वेळी उद्धव ठाकरे हे गिरणी कामगारांना घरे मिळाली पाहिजे म्हणून आमच्या मोर्चात सामील झाले, तर देवेंद्र फडणवीस विधानसभेत आमच्यासाठी लढत होते. आता सत्तेच्या तुपात लोळत पडलेल्या या मंडळींना गिरणी कामगारांच्या घरांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यास कोणी रोखले आहे, असा सवाल दत्ता इस्वलकर यांनी केला. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ आहे, मग गिरणी कामगारांसाठी ते कधी वेळ काढणार, असा सवाल करून महापालिका निवडणूक जवळ आली की त्यांना आमची आठवण येईल. गिरणी कामगारांना आधी घरे द्या, मग सर्वाना घरे देण्याच्या बाता मारा, असा टोलाही इस्वलकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. आतापर्यंत गिरणी कामगारांसाठी ६९२५ घरांची सोडत काढण्यात आली, मात्र ती आघाडी सरकारच्या काळात असे त्यांनी स्पष्ट केले. वाटा निश्चित करा! गिरण्यांच्या जमिनीपैकी १/३ जागा महापालिका, म्हाडा व गिरणी मालक यांच्यात वाटप करण्याची तरतूद आहे. त्यानुसार म्हाडाला मिळणाऱ्या जमिनीवर गिरणी कामगार व सार्वजनिक गृहनिर्माण सदनिका समप्रमाणात बांधल्या जाणार आहेत. एकूण ५८ गिरण्यांपैकी १२ गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा निश्चित करण्यात आलेला नाही. सध्या सहा गिरण्यांच्या जागेवर २६३४ सदनिका बांधण्याचे काम सुरू आहे, तर तीन गिरण्यांच्या जमिनीवर ४१६० सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे.