मुंबईतील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत काही कडक निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबई शहर व महाराष्ट्रात करोना रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत काही कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. अगोदपासूनच रात्री जी संचारबंदी सुरू होती, आता त्यात हा बदल असेल की केवळ अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांनाच रात्री वाहन चालवण्यास परवानगी मिळेल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

तसेच, रेस्टॉरंट, मॉल्स, दुकानं यांना अगोदरपासूनच रात्री बंदी होती आणि त्यांना केवळ टेक अवे व पार्सलची सुविधा दिली जाईल बाकी बंद असेल. उद्योग जगाताबाबत देखील नियमावली बनवण्यात आलेली आहे. याबाबत विस्तृत माहिती दिली जाणार आहे. मात्र उद्योग जगत कसं चालेल, त्याच्या वेळा काय असतील व तिथे जर करोनामुळे काही परिणाम होत असेल, तर उद्योग चालवणाऱ्यावरच सर्वस्वी जबाबदारी असेल. असे यावेळी अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर रात्री केवळ बेकरी, मेडिकल स्टोअर्स किंवा अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असेल. याशिवाय, वर्क फ्रॉम होमला परवानगी असणार आहे. केवळ तेच कार्यालयं सुरू असतील जिथे विमा संबधित कामकाज, मेडिक्लेम, इलेक्ट्रीसिटी संदर्भातील कामं, मनपाशी संबंधित कामं असतील. याशिवाय, थिएटर्स, नाट्यगृहे यांच्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे. धार्मिक स्थळांवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असणार आहेत. मैदानं, उद्यानं पूर्णपणे बंद असणार आहेत. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. चित्रपटाचं शुटींग मोठ्याप्रमाणवर कुठंही करता येणार नाही. असं देखील यावेळी पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये मुंबईचाही समावेश आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या देशातील टॉप १० जिल्ह्यांमध्ये मुंबईदेखील आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने काही जिल्ह्यांनी शहरांमध्ये कडक निर्बंध लावले आहेत. मुंबईतदेखील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जमवाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत पुन्हा लॉकडाउन लागण्यासंबंधी चर्चा सुरु असून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

मुंबईत पुन्हा लॉकडाउन?; पालकमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

”लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण लॉकडाउन उठवला आहे. पुन्हा लॉकडाउन लावण्याच्या मनस्थितीत आपण नाही. पण आवाहन आपण करत राहतोय, लोकांना हे टाळू शकतो असं सांगत आहोत. पण जर लोकांचा जीव वाचवायचा की त्यांचा व्यवसाय, उत्पन्न वाचवायचं अशी परिस्थिती आली तर लोकांचा जीव कसा वाचवता येईल या मानसिकतेने सरकार प्रयत्न करत आहे,” असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.