विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीच्या तिरक्या चालीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने अर्ज भरताच नगरमध्ये काँग्रेसने जशास तसे उत्तर दिले. राष्ट्रवादी भाजपला मदत होईल अशी भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसमधून केला जात आहे.

मुंबईतील दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसाद लाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. लाड यांच्या उमेदवारीशी आमचा काहीही संबंध नाही, असा दावा राष्ट्रवादीने केला असला तरी पक्ष नेतृत्वाच्या आशीर्वादाशिवाय लाड अर्ज दाखल करणार नाहीत, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीची १४ मते असून, काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यासाठी ती महत्त्वाची आहेत. लाड रिंगणात राहिल्यास त्याचा काँग्रेसला फटका बसून, भाजपलाच फायदा होऊ शकतो. लाड यांच्या उमेदवारीला भाजपची फूस असल्याचे बोलले जाते.
मुंबईत राष्ट्रवादीने तिरकी चाल केल्याने काँग्रेसने नगरमध्ये उमेदवार रिंगणात उतरविला आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने माजी राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने विद्यमान आमदार महादेव महाडिक यांची बंडाचे निशाण रोवले. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या महाडिक यांना भाजप पाठिंबा देणार आहे. याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल, असा दावा महाडिक यांनी केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसकरिता निर्णायक ठरणार आहे. येथे राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतल्यास मुंबईप्रमाणेच कोल्हापूरमध्ये काँग्रेस अडचणीत येऊ शकते.

राष्ट्रवादीशी चर्चा – चव्हाण
मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने अर्ज दाखल केला आहे. नगरमध्ये आमच्या माजी आमदाराने अर्ज भरला आहे. हा सारा गोंधळ दूर करण्याकरिता अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

‘आता खुनाचा गुन्हा कोणावर?’
वर्षभरात तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्याला सरकार जबाबदार आहे, आता कोणाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करायचा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. दोन अधिवेशनांमध्ये विक्रमी पुरवणी मागण्या सरकारने सादर केल्याने वित्तीय शिस्त पूर्णपणे ढासळल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेत नाही. त्यामुळे आत्महत्यांचा आकडा वाढत आहे.