भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. तसंच यावेळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलीसदेखील याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

“राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. “राजगृहाच्या आवारात शिरून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन

“मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी” असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आव्हाडांकडूनही निषेध

“राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधलं होतं. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. तसेच आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन केली आहे.

आरोपींना अटक करा – फडणवीस

“भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.