दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणाऱ्या नोकरदारांनी यंदा मात्र एसटीकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील भीषण दुष्काळाची झळ आपापल्या गावातही सोसावी लागण्याच्या भीतीने गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत एसटीच्या प्रवासी संख्येत चार टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न ३० ते ३५ कोटींनी कमी झाल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. परीक्षेचा काळ संपल्यानंतर हवापालट करण्यासाठी नोकरदार आपल्या गावाची वाट धरत असतो. मात्र यंदा राज्यातील भीषण दुष्काळ पाहता, बहुसंख्य नोकरदारांनी गावी न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान एसटी महामंडळाकडून सोडण्यात आलेल्या बस गाडय़ांपैकी ५० टक्केही गाडय़ांचे आरक्षण झालेले नाही. त्याचप्रमाणे यंदाच्या जानेवारी महिन्यापासून एसटीचे भारमान घसरू लागले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत एसटीचे प्रवासी भारमान ५५ टक्के होते. ते यंदाच्या वर्षी ५३.७० टक्क्यांवर पोहोचले असल्याचे सांगितले जात आहे.