शाळाप्रवेशाचा पहिलाच दिवस आज राज्यभर उत्सवी वातावरणात साजरा झाला. नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा गणवेश अशा साऱ्या नवलाईतच, आयुष्यातील नव्या दिवसाची स्वप्ने पाहणाऱ्या चिमुकल्यांना आणि त्यांच्या पालकांनाही आजचा दिवस आनंदाचा एक आगळा अनुभव देऊन गेला. फुलांच्या माळांनी आणि आंब्याच्या डहाळ्यांनी सजलेल्या वर्गाच्या दरवाजातच, प्रत्यक्ष गुरुजींनीच फुले देऊन स्वागत केले आणि रडवेल्या चेहऱ्याने व पावलांनी वर्गाकडे सरकणारे चिमुकले चेहरे उत्साहाने खुलून गेले. शाळेचा उंबरठा पहिल्यांदाच ओलांडणाऱ्या मुलांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी शाळेच्या परिसरात स्वच्छ, आनंददायी व मुलांना शिक्षणाची ओढ वाटेल असे वातावरण निर्माण करण्याच्या सूचना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गेल्या महिन्यातच शिक्षण विभागाला दिल्या होत्या. शाळाप्रवेशाचा पहिला दिवस कंटाळवाणा न राहता, अविस्मरणीय राहावा, प्रत्येक मुलाला शाळेतील आपल्या पहिल्या दिवसाची आठवण आयुष्यभर मनात ताजी राहावी यासाठी प्रवेशाचा पहिला दिवस हा ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्याची कल्पना तावडे यांनी मांडली होती. त्यानुसार प्रवेशोत्सव कसा साजरा करावा यासंबंधीच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना दिल्या गेल्या आणि विदर्भ वगळता उर्वरित सर्व जिल्ह्य़ातील शाळांमध्ये सरकारी योजनेबरहुकूम हा उत्सव साजरा झाला. स्वत विनोद तावडे यांनी मुंबईत राजा शिवाजी विद्यासंकुलात हजर राहून शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव घेणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत केले, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि नंतर महापालिकेच्या ‘व्हच्र्युअल ट्रेनिंग स्टुडिओ’मधून मुंबईतील सुमारे साडेचारशे शाळांमधील मुलांसोबत संवादही साधला. सकाळी सात ते साडेसात या अध्र्या तासात अनेक शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांच्या तालावर प्रभातफेऱ्या काढल्या गेल्या. मुलांना पुस्तक दिनानिमित्त मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अनेक शाळांमध्ये गोडधोड पोषण आहार देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. राज्यातील या आगळ्या प्रवेशोत्सवामुळे, शाळाप्रवेश हा आयुष्यातील आनंददायी, अविस्मरणीय व टवटवीत अनुभव ठरेल,असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.