हजारोंच्या लाँग मार्चचा मुंबईत ठिय्या; विधानसभेला आज घेरावाचा इशारा

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. सर्व शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या, कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा, या आणि अन्य मागण्यांसाठी शेतकरी सोमवारी विधानसभेला घेराव घालणार आहेत. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले. त्यामुळे कमालीच्या अस्वस्थ झालेल्या सत्ताधारी देवेंद्र फडणवीस सरकारची रविवारी धावपळ झाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनातील आक्रमकता कमी करण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने तडजोडीची भूमिका घेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना किसान सभेच्या नेत्यांच्या भेटीला पाठवले. या भेटीत महाजन यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. मात्र, मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हटणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवली. सरकारने आधीच चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. आता मात्र मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय माघार नाही, असा इशारा किसान सभेचे सरचिटणीस आणि शेतकरी आंदोलनाचे समन्वयक अजित नवले यांनी दिला.  हा मोर्चातील शेतकऱ्यांचा जत्था रविवारी सोमय्या मैदानावर दाखल झाला. तिथेच हा मोर्चा अडवण्याचा सरकारचा इरादा आहे. फडणवीस सरकार आज, सोमवारी या प्रश्नावर कोणता तोडगा काढणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

परीक्षा वेळेवरच, लवकर निघा!

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर संभाव्य वाहतूककोंडी, गर्दी लक्षात घेऊन आज, सोमवारी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी लवकर निघावे. परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.