सावत्र मुलीला विहिरीत ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला पिता भन्सनाथ ऊर्फ वसंत हरिजन याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. सईद यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो भिवंडीतील लिंबुचापाडा येथील रहिवासी आहे.
भन्सनाथ याचा लता हिच्याशी पुनर्विवाह झाला होता. लताला पहिल्या पतीपासून पल्लवी ही मुलगी होती. लतापासून त्याला एक मुलगा झाला होता. हे कुटुंब एकत्र राहत होते. भन्सनाथ नेहमी लतावर चारित्र्याचा संशय घ्यायचा. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भोजनावरून लता आणि भन्सनाथ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रागामध्ये त्याने पत्नी लता आणि सावत्र मुलगी पल्लवीला घराजवळच्या विहिरीत ढकलून दिले. शेजाऱ्यांनी धावपळ केल्यानंतर लताला वाचविण्यात यश आले. पण पल्लवी बुडून मरण पावली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हेमलता देशमुख यांनी काम पाहिले.