प्रसाद रावकर देवनारसह कुलाबा, वांद्रे, मालाड आणि घाटकोपरची निवड मुंबईत निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाच ठिकाणी वर्गीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. देवनारसह कुलाबा, वांद्रे, मालाड आणि घाटकोपर या ठिकाणचे भूखंड याकरिता निवडण्यात आले असून या ठिकाणी प्रतिदिन १०० ते ३०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची केंद्रांची क्षमता आहे. मात्र, आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण होऊन ही केंद्रे कार्यान्वित होण्यास डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. आजघडीला मुंबईत दररोज तब्बल ७५०० मेट्रिक टन ते ८००० मेट्रिक टनांदरम्यान कचरा निर्माण होतो. यामध्ये सुमारे एक हजार मेट्रिक टन सुका कचरा निर्माण होतो. मात्र त्यापैकी केवळ ३०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिकेला यश आले आहे. उर्वरित सुमारे ८०० मेट्रिक टन कचरा ओल्या कचऱ्यासोबत कचराभूमीत जात आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच डोकेदुखी बनत आहे. मुंबईमधील सोसायटय़ांना ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक सोसायटय़ांमधील रहिवाशी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवत आहेत. मात्र वेगवेगळा ठेवण्यात येणारा कचरा स्वतंत्रपणे वाहून नेण्याची सक्षम अशी यंत्रणा पालिकेकडे नाही. काही संस्थांना पालिकेने ओला-सुका कचरा वर्गीकरण करण्याचे काम दिले असून या संस्थांच्या माध्यमातून प्रतिदिन केवळ ३०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिका यशस्वी झाली आहे. मात्र ८०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. कुलाबा येथील सुरक्षा उद्यान येथील ४,८४९.८९ चौरस मीटर, वांद्रे (प.) येथील वांद्रे महानगर टेलिफोन एक्स्चेंजजवळील ८४० चौरस मीटर, मालाड येथील मालवणी परिसरातील १,६४४.८१ चौरस मीटर, देवनार येथील शिवाजीनगरमधील कचराभूमी मार्गाजवळ ५००० चौरस मीटर आणि घाटकोपर परिसरातील किरोल येथील भटवाडी स्मशानभूमीजवळील ४,०४८ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांची सुका कचरा वर्गीकरण केंद्रांसाठी निवड करण्यात आली आहे. या पाच ठिकाणी १०० ते ३०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या केंद्राच्या उभारणीबाबत सुरू असलेली प्रक्रिया नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल आणि डिसेंबर महिन्यात ही केंद्रे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.