‘राष्ट्रहित हे सर्वोच्च असून त्याचे रक्षण करण्यासाठी हिंसाही समर्थनीय ठरते,’ असे प्रतिपादन करीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमनला दिलेली फाशी ही न्याययंत्रणेच्या आदेशाने व कायद्यानुसार दिल्याचे स्पष्ट केले.
थरूर यांचे नाव न घेता टीकाकारांचे कठोर शब्दांमध्ये खंडन करीत वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहित हे नेहमीच सर्वोच्च असते. टायगर मेमनला भारतात आणता आले नाही, यासाठी याकूबला फाशी देण्यात आल्याची टीकाही निर्थक व अयोग्य असून दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत, त्याचा एकत्रित विचार करता येणार नसल्याचे डोवल म्हणाले. अमेरिकेवरील अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी स्वातंत्र्य व अन्य बाबींचा उल्लेख करून राष्ट्रहित सर्वोच्च असल्याचा दाखला डोवल यांनी दिला. तर जयापजय आणि सर्वच बाबी समान पातळीवर असल्याची मनोधारणा केल्यावर देशहितासाठी केलेली कोणतीही कृती योग्य व क्षम्यच असते, असे त्यांनी नमूद केले. ललित दोशी मेमोरियल फाऊंडेशनतर्फे आयोजित स्मृतिव्याख्यानात ‘राष्ट्रीय सुरक्षा, राजनीती आणि मूल्यभेद’ विषयावर डोवल बोलत होते. दाऊद व टायगर मेमनला भारतात का आले जात नाही, प्रश्नावर देशाची संरक्षणसिद्धता आणि व्यक्तींकडून अंतर्गत सुरक्षेला असलेला धोका या वेगळ्या बाबी आहेत, असे ते म्हणाले.