सध्या महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु असून पोलीस भरतीसाठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवलं आहे. चारही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विक्रोळीत ही घटना घडली आहे. काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी या तरुणींची नावं आहेत.

पोलीस भरती सुरु असल्याने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक चाचणी सुरु आहे. विक्रोळीतही आज तरुणींची भरती प्रक्रिया सुरु होती. द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर शारिरीक चाचणी सुरु होती. भरती प्रक्रिया संपल्यानंतर तरुणी विक्रोली स्थानकाच्या दिशेने जात असताना टाटा झेन कारने त्यांना उडवलं. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान दीपाली काळे या तरुणीला जास्त दुखापत झाली आहे. तिला सायनच्या टिळक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतलं आहे.