जोगेश्वरीच्या बेहराम बाग गांधी शाळेजवळून दोन विद्यार्थिनींचे अपहरण करुन त्यापैकी एकीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच अल्ताफ याकुब पटेल (२६) आणि अरमान नफिज खान (२२) या दोन आरोपींना अटक केली असून आरोपींना मदत करणारा रिक्षाचालक मात्र अजून ताब्यात आलेला नाही.
अल्ताफ व अरमान यांनी दुपारी दीडच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेच्या बेहराम बाग गांधी शाळेत शिकणाऱ्या या दोन मुलींना बळजबरीने रिक्षामध्ये बसवून जवळील निर्जन मैदानावर नेले. तेथे एका मुलीवर बलात्कार करण्यात आला, तर दुसरीचा विनयभंग करण्यात आला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. या दोन्ही मुलींनी घरी जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या पालकांनी ओशिवारा पोलिस ठाण्यात धाव घेतली. चौकशीदरम्यान या मुलींनी पोलीसदफ्तरी नोंद असलेल्या अल्ताफला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गौतम नगरमधील बेहराम बाग परिसरातून अल्ताफ आणि अरमान यांना अटक केली.
अल्ताफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीचे ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबई आणि उपनगरातून त्याला एक वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले आहे. ‘परिमंडळ-९’चे उपआयुक्त डॉ. छेरिंग दोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त धनेधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासिर पठाण, पोलीस निरीक्षक नटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक पठारे यांच्या पथकाने या दोघांना अटक केली.