स्वातंत्र्योत्तर भारतात शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भारताचा सर्वागीण विचार करून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले. त्यातील काही रुजले तर काही फसले. सर्व शिक्षा अभियान यशस्वी ठरत असल्याचेही दावे केले जात आहेत. मात्र खरोखरच आपण सर्वाना शिक्षण देतो का? या शिक्षणाचा दर्जा काय? आपल्या शिक्षण पद्धतीत देशभक्ती, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवा यांना नेमके काय स्थान आहे? देशात आजही तीस टक्क्यांहून अधिक लोक निरक्षर आहेत. इंग्रजी वाचता येणाऱ्यांची संख्या दोन टक्केही नाही. संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांची संख्या अत्यल्प म्हणावी लागेल. अशा परिस्थितीतही आम्ही महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो. दिवंगत भारतरत्न व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मतानुसार २०२० साली भारत महासत्ता होईल. त्यांना हा दुर्दम्य आत्मविश्वास कोणत्या कारणांमुळे होता ते त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. उद्याची तरुण पिढी आणि तळमळीने शिकविणारे शिक्षक यांच्या विश्वासावर समर्थ भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले, हे स्वप्न उराशी बागळून अनेक शिक्षक आज विद्यादानाच्या यज्ञात सहभागी होताना दिसतात.

शिक्षक आपले विद्यादानाचे काम करत असताना देशात काय चित्र दिसते? जातीपातीचे राजकारण, आरक्षणाचा सावळागोंधळ, वाढती बेरोजगारी या साऱ्याशी लढत तळमळीने विद्यादानाचे काम करणारे अनेक शिक्षक डॉ. अब्दुल कलाम यांचे समर्थ भारताचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. प्रा.रमेश बुटेरे हे अशांपैकीच एक आहेत. अंबरनाथ तालुक्यात बदलापूरपासून १३ किलोमीटर अंतरावर लव्हाळी नावाचे एक आदिवासी गाव आहे. येथे साधारणपणे तीस ते चाळीस पाडे असून १९९९ च्या सुमारास आदिवासी मुलांसाठी ज्ञानाचा दिवा घेऊन रमेश बुटेरे तेथे पोहोचले. महाविद्यालयात ‘एनएसएस’मध्ये असतानाच सामाजिक काम करावे असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले होते. तशातच शिवसेनेचे दिवंगत मंत्री साबीर शेख यांच्याशी ओळख झाली. त्यांनाही आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवायचा होता. त्यामुळे त्यांनी दोघांनी मिळून काम करायचे ठरविले. साबीर शेख यांनी लव्हाळी येथे छोटीशी जागा मिळवली. आपल्या गुरूंच्या नावे म्हणजे ‘गुरुवर्य नानासाहेब सबनीस’ यांच्या नावे शिक्षणसंस्था काढली. माळरानावर एका आदिवासीने आपली जागा दिली होती. सुरुवातीला मुले जमा करण्याचे दिव्य करावे लागायचे. या मुलांना शाळेविषयी कल्पना आणि आस्था नव्हती. मुलं शाळेत आणली की पळून जायची, असे बुटेरे सर सांगतात. सुरुवातीला ६६ मुले होती. दोन वर्गखोल्यांमधून शाळेचे कामकाज चालायचे. मात्र गेल्या सतरा वर्षांत शाळेने मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीला प्राथमिक शाळा होती. आता शाळा माध्यमिक झाली असून ४०० आदिवासी मुले-मुली या शाळेत शिकतात. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. दोन आदिवासी मुलांना ८० ते ८५ टक्के गुण मिळाले. या शाळेतून दहावी शिक्षण घेतलेल्या दोन मुली आज परिचारिका बनल्या आहेत. अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थिरावले आहेत. एकजण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. शाळेतून बाहेर पडल्यानंतरही आपल्या विद्यार्थ्यांकडे बुटेरे सरांचे बारीक लक्ष आहे. त्यांना शिक्षणासाठी काहीही मदत लागली तर ते लगेच धावून जातात. साबीर शेख यांच्यामुळेच ही आश्रम शाळा उभी राहिल्याचे ते अभिमानाने सांगतात.

नानासाहेब सबनीस शिक्षण मंडळाच्या या आदिवासी शाळेत सर्व अद्ययावत सुविधा आहेत. मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, स्वच्छतागृहे, योग प्रशिक्षण कक्ष,  भोजनगृह, संगणक कक्ष, स्मार्ट क्लासरूम, प्रयोगशाळा, कोठीगृह, खेळण्याचा कक्ष, मैदान सारे काही येथे आदिवासी मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्मार्ट क्लासरूमची संकल्पना खरोखरच उत्तम आहे. येथे सॅमसंग कंपनीने मुलांसाठी २५ लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे एलईडी स्क्रीनसह अत्याधुनिक तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकविण्याची व्यवस्था आहे. उद्या हा आदिवासी मुलगा जगाच्या स्पर्धेत गेल्यानंतर सक्षमपणे उभा राहिला पाहिजे ही तळमळ यामागे संस्थेची आहे. या शाळेत आणखी एक सुंदर संकल्पना राबविली जाते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जशी मुलांसाठी आभाळाच्या छताखाली शांतीनिकेतन सुरू केले, काहीशी तशीच संकल्पना आदिवासी मुलांसाठी राबविण्यात आली आहे. येथे पुस्तके बंद कपाटात ठेवण्यात येत नाहीत तर खुल्या मैदानात स्टँडवर पुस्तके ठेवलेली आहे. तिथे लिहिले आहे ‘माझ्याकडे पाहा.’ मुलांनी ती पुस्तके कशीही वापरावीत. अगदी फाडली तरी चालतील, परंतु त्यांनी पुस्तके हाताळली पाहिजेत, वाचली पाहिजेत, हा त्यामागचा हेतू.

या शाळेत केवळ अभ्यासच शिकवला जात नाही तर सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कामही केले जाते. संस्कार शिबिरे घेऊन सुसंस्कारासाठी चांगल्या व्यक्तींच्या गोष्टी सांगितल्या जातात. ढोल-लेझीमपासून भोंडलापर्यंत अनेक सांस्कृतिक गोष्टीही शिकविल्या जातात. रमेश बुटेरे यांनी याबाबत सांगितले की, साबीर शेख नेहमी म्हणायचे डॉक्टर-इंजिनीअर बनविणाऱ्या अनेक संस्था आहेत व होतीलही, परंतु माणूस घडवणे हे आपले ध्येय आहे. शासनाकडून प्रतिमुलासाठी अवघे ९०० रुपये महिन्याकाठी मिळतात. यामध्ये जेवण, राहणे, शिक्षण म्हणजे वह्य़ा-पुस्तकांपासून गणवेशापर्यंत तसेच टुथपेस्टपासून आंघोळीच्या साबणापर्यंत सारे काही द्यावे लागते. सध्या शाळेत १६ शिक्षकांसह २८ कर्मचारीवर्ग आहे.

– प्रा. रमेश बुटेरे ९३२३४९५२३४.