निसर्ग या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुंबईतील राणीचा बाग अर्थात वीरमाता जिजामाता भोसले उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राणीच्या बागेतल्या या प्राण्यांना त्यांच्या पिंजऱ्यात असलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात आलं आहे. झाड पडून किंवा इतर कोणतीही आपत्ती येऊन त्यांना इजा होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करुन या संदर्भातली माहिती दिली आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार वीर माता जिजामाता भोसले उद्यानातील वाघ, बिबळ्या, तरस आणि इतर प्राण्यांना उद्यानातल्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या विस्तीर्ण उद्यानात अनेक झाडं आहेत. त्यापैकी एखादं झाड या प्राण्यांवर कोसळून त्यांना इजा होऊ शकते. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच सीसीटीव्हीद्वारे मुख्य उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या मुख्य भागांवर लक्षही ठेवण्यात येतं आहे.