मुंबईच्या आयुक्तपदावर नियुक्ती न झाल्याने नाराज असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कांबळे यांचे मन वळवण्यात वरिष्ठ मंत्री व ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सोमवारी यश आले. कांबळे यांची नाराजी दूर झाल्याने ते आज, मंगळवारपासून ठाण्याचे आयुक्तपद स्वीकारतील. मुंबईच्या आयुक्तपदावर राकेश मारिया यांची नियुक्ती होताच कांबळे यांनी नाराजी व्यक्त करत ठाण्याच्या आयुक्तपदाचा स्वीकार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ते रजेवर गेले होते. कांबळे यांच्या नाराजीमुळे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे कांबळे यांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ मंत्री व ज्येष्ठ पोलीस अधिकारी सातत्याने प्रयत्नरत होते. अखेरीस सोमवारी त्यास यश आले. मंगळवारी सकाळी ते ठाण्याच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. त्यामुळे कांबळे राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, कांबळे व जावेद अहमद यांच्या नाराजीमुळे पोलीस दलात निर्माण झालेल्या बेशिस्तीची गंभीर दखल घेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उभयताना सात दिवसांच्या आत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले होते. या पाश्र्वभूमीवर कांबळे यांची नाराजी दूर झाली हे विशेष. मुंबईच्या आयुक्तपदी राकेश मारिया यांच्या नियुक्तीचे जोरदार समर्थनही आर. आर. पाटील यांनी केले. विजय कांबळे हे मागासवर्गीय आहेत, म्हणून त्यांना मुंबईचे आयुक्तपद दिले नाही, हा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा आरोप आर. आर. यांनी फेटाळून लावला. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मारिया यांची नियुक्ती करताना कायदेशीर बाबी व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतल्याचे सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वादामुळे पोलीस आयुक्तपदावरील नियुक्त लांबणीवर पडल्याच्या टीकेचेही त्यांनी खंडन केले.पोलीस दलात जात-पात धर्म असा कधीच भेदाभेद केला जात नाही, पोलिसांची फक्त खाकी वर्दी बघितली जाते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पोलीस आस्थापन मंडळाने विजय कांबळे, माथूर व राकेश मारिया यांची शिफारस केली होती. अर्थात चौथ्या नावाचाही विचार करण्याचे सरकारला विशेष अधिकार आहेत. - आर. आर. पाटील, गृहमंत्री