‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात अनिता दाते हिचे प्रतिपादन मनोरंजन क्षेत्रात सतत काम मिळत नसते. या क्षेत्रात सातत्याने नवीन कला येत असतात आणि त्या सादर करणारे नवीन चेहरे येत असतात. यात कलाकार म्हणून स्वत:ला या क्षेत्रात टिकवण्यासाठी सातत्याने काही तरी नवीन शिकणे आणि स्वत:ला सिध्द करणे गरजेचे असते, असे मत अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिने ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात बुधवारी व्यक्त केले. ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात अनिता बोलत होती. मनोरंजन क्षेत्रात ज्या काळात काम मिळत नाही, त्या काळात आपण काय करतो, कोणाशी बोलतो या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. अनेकदा जेव्हा आपण काही काम करत नसतो तेव्हा लोक आपल्याला ‘सध्या तू काय करते आहेस’ असा प्रश्न हमखास विचारतात. तेव्हा मी सध्या काहीच करत नाही, हे लोकांना तितक्याच आत्मविश्वासाने सांगता यायला हवे. आपण आयुष्यात ज्या काळात काहीच करत नसतो तो काळसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात अनेकदा निराशा येत असते. मात्र सकारात्मक भूमिका ठेवून हे आव्हान स्वीकारले पाहिजे. या काळात आपण स्वत:ला वेळ देऊन स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच या क्षेत्रात काम करताना सहकलाकारांबरोबर कधीही स्पर्धा करू नये. आपली स्पर्धा ही नेहमी स्वत:शी असते. आज केलेले काम, उद्या अधिक चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न सातत्याने करावा, असेही अनिता दाते हिने सांगितले. मनोरंजन विश्वातील ‘कास्टिंग काऊच’विषयी अनिता म्हणाली की, मनोरंजन क्षेत्रात वाईट माणसे भेटतात, मात्र ती फक्त स्त्रियांचे शोषण करतात, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र ही वाईट माणसे आपल्याला सर्वच क्षेत्रांत भेटतात. त्यामुळे ‘नाही’ म्हणण्याचा आपल्याला असलेला अधिकार स्त्रियांनी वारंवार बजावला पाहिजे, असे मार्गदर्शन तिने या वेळी केले. आव्हान स्वीकारा राधिकेच्या सहनशील भूमिकेविषयी प्रेक्षकांशी संवाद साधताना, त्यांनी आव्हान स्वीकारण्याचा सल्ला दिला. एखादी गोष्ट आपल्याला पटली नसल्यास ती आव्हान म्हणून स्वीकारायला हवी. भूमिका साकारताना एखादे दृश्य योग्य वाटत नसले तरी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून ते योग्य असल्याने ते दृश्य साकारण्याचे आव्हान अगदी सहज पार पाडले जाते, असेही तिने सांगितले.