‘इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशन’चा ‘जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा मुंबई महानगरपालिके ला मिळाला आहे. पाणीपुरवठय़ासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, कुशल प्रशासन आणि सक्षम व्यवस्थापनातून पाण्याचा दर्जा सुधारून नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.

सन २०१९-२० या वर्षांकरिता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून हा पुरस्कार पालिके चे उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोरे यांनी हैदराबाद येथे स्वीकारला. पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत  ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील २१ शहरांमध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून ते ४७ मानकांच्या आधारे तपासण्यात आले. वरळी, करी रोड, शिवडी, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील वस्त्यांमधून पाण्याचे नमुने घेण्यात आले.

पालिके तर्फे  दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. आरोग्य खाते व गुणनियंत्रण (जलकामे) विभागाकडून रोज ११० ते १३० ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेत ‘मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक’ (एम.एफ.टी.) या अद्ययावत तंत्रज्ञानाने डब्ल्यूएचओ मानांकनानुसार तपासले जातात. दादर येथील प्रयोगशाळेला डिसेंबर २०२० मध्ये ‘नॅशनल बोर्ड ऑफ लॅबोरेटरीज’चे नामांकन प्राप्त झाले आहे.

पालिकेने २०१३-१४ ते सन २०१९-२० या कालावधीत जीर्ण झालेल्या विविध व्यासांच्या २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलल्या. त्याबरोबर १ लाख  ७५ हजार  ठिकाणची गळती शोधून दुरुस्ती के ली. विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९ हजार ९०८ सेवा जोडण्या बदलल्या. २०१२ ते २०१८ पर्यंत विविध जलबोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले.  अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई क्षेत्रातील पाणीपुरवठय़ात बदल घडवण्यात येत आहे.