नाशिकचं शहरी जीवन मागे टाकून मध्य प्रदेशातील नर्मदेच्या किनाऱ्यावरील मुलांच्या आयुष्यात शिक्षणाची नर्मदाआणणाऱ्या भारती ठाकूर. यंदाच्या आपल्या पहिल्या दुर्गा.  १४ मुलांपासून सुरू झालेली त्यांची नर्मदालयशाळा आता २०५० मुलांना शिक्षण देत असून तिचा विस्तार १५ गावांमध्ये झाला आहे. त्यांची निमाड अभ्युदय मॅनेजमेंट रुरल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशनही संस्था शिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षणही देते आहे. संपूर्ण विनामूल्य असणाऱ्या या शाळांनी नर्मदेच्या किनाऱ्यावरील मुलांच्या आयुष्याला सुपीकतेच्या वाटेवर आणून ठेवलं आहे.

भरभक्कम पगाराच्या नोकरीला तिलांजली देत, शहरी सुखासीन आयुष्य मागे ठेवत भारती ठाकूर यांनी मध्य प्रदेशच्या निमाड भागातील गरीब, अशिक्षित मुलांमध्ये शिक्षणाची ‘नर्मदा’ खेचून आणली. या मुलांचं आयुष्य मार्गी लावत त्यांना शैक्षणिक सुपीकतेच्या वाटेवर आणून सोडलं आहे. सहा वर्षांपूर्वी १४ मुलांपासून सुरू झालेली ‘नर्मदालय’ शाळा आज १५ गावांमध्ये विस्तारली असून २०५० मुलं तेथे शिक्षण घेत आहेत. यातील ८० टक्के मुली आहेत. याचबरोबरच ३१अनाथ मुलांसाठी आश्रम, २० मुलांचं व्यावसायिक प्रशिक्षण असा ‘निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन’ या त्यांच्या संस्थेचा विस्तार वाढत चालला असून नर्मदेच्या काठावरच्या प्रत्येकाला शिक्षण मिळावं, हे भारती ठाकूर याचं स्वप्न आहे.

आईवडील आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आणि त्याहीपेक्षा स्वत:च्या जिद्दीमुळे भारती यांनी शाळा-महाविद्यालयाचं शिक्षण पार केलं, लष्कराच्या आर्टिलरी सेंटरमध्ये शासकीय सेवा केली. प्रकृतीची साथ नसणे हे नित्याचंच होतं. पण तरीही नाशिक-दिल्ली सायकल भ्रमण, सह्य़ाद्री आणि हिमालयातील गिरीभ्रमण, पर्वतारोहणाचं प्रशिक्षण यांसारख्या साहसी गोष्टी त्या करत आल्या. २००५, २००६ मध्ये दोन मैत्रिणींसोबत नर्मदा परिक्रमा त्यांनी हाती घेतली आणि साडेपाच महिन्यांत पूर्ण केली. ही परिक्रमा पूर्ण करताना नर्मदामाईच्या प्रेमात त्या पडल्याच, पण त्याही पेक्षा नर्मदेच्या सुपीक काठावरची गरिबी, अज्ञान, व्यसनाधीनता त्यांना अस्वस्थ करून गेली आणि २००९ मध्ये त्यांनी नाशिक सोडून कायमचं नर्मदा किनारी मुक्कामाला जायचं ठरवलं.

त्या वेळी तिथलं चित्र अर्थातच नकारात्मकच होतं. त्यांची स्वत:ची राहायची, खायची काही सोय नाही अशा ठिकाणी जायचं होतं. शाळेत जायचं सोडून गावभर टिंगल-टवाळी करणाऱ्या, बिडीकाडी, गुटका यांच्या आहारी गेलेल्या,

दारू पिणाऱ्या आणि पत्ते कुटणाऱ्या (वडिलांच्याबरोबरीने) खेडय़ात जगणाऱ्या मुलांच्या विकासासाठी काम करायचं होतं. हाताशी ना पैशाचं पाठबळ, ना मध्य प्रदेशातील या भागाचा इतिहास-भूगोल माहीत होता. परिक्रमेच्या वाटेत येऊन गेलेल्या ओंकारेश्वर-महेश्वर-मंडलेश्वर या परिसरात त्यांचं कार्यक्षेत्र हळूहळू ठरत गेलं. शाळा सुरू व्हायच्या आधी मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी रोज सकाळी  छोटय़ा-मोठय़ा इमारतीत गाणी, नाच, गोष्टी शिकवीत तीन-चार वर्षांच्या  मुला-मुलींसाठी मोफत वर्ग भरवायला सुरुवात केली. एका गावच्या एका सधन शेतकऱ्याने आपला गोठा रिकामा करून दिला. त्यातच शाळा सुरू झाली. १४ मुलांपासून सुरू झालेली ही शाळा, त्याला नाव दिलं, ‘नर्मदालय’. मग एका खेडय़ातून दुसऱ्या खेडय़ात असा पसारा वाढत गेला आणि २०१० मध्ये  ‘निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन’ ही संस्था नोंदणीकृत झाली आणि त्याच्या छत्राखाली ‘नर्मदालय’ शाळा सुरू झाल्या.

आज पंधरा गावांत पंधरा ठिकाणी नर्मदालय अनौपचारिक शाळा असून मुलांची संख्या झाली आहे १७००, तर भट्टय़ाण, लेपा पुनर्वास आणि छोटी खरगोन या गावात ‘रामकृष्ण शारदा निकेतन’ नावाने पहिली ते आठवीचं शिक्षण देणाऱ्या तीन शाळाही सुरू झाल्या आहेत. यात सुमारे ३५० मुलं नियमित शाळा शिकत आहेत. शिवाय खेडय़ातल्या लोकांना आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र करेल असं सुतारकाम, वेल्डिंग, प्लम्बिंग, होमवायरिंग, शिलाई, जैविक शेती आणि १३ गाईच्या गोशाळेच्या माध्यमातून दुग्धव्यवसायाचंही प्रशिक्षण दिलं जात आहे. आज तेथे  २० मुलं हे शिक्षण घेत आहेत.

या सर्व मुलांना विनामूल्य शिक्षण दिलं जात असून ३१ अनाथ आणि गरीब मुलांचा आश्रमही नि:शुल्कच आहे. या मुलांना शिकवण्यासाठी एकूण ६२ शिक्षक आहेत आणि सहा मदतनीस. या साऱ्यांचा खर्च या संस्थेला करावा लागतो तो आहे दर महिना अडीच लाख रुपये. दर महिन्याच्या २५ तारखेला भारती यांना पैसे कमी पडणार नाहीत ना याचा ताण येत असतोच, परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने आत्तापर्यंत सोय झालीच आहे. तसंच हा खर्च निघावा म्हणून त्यांनी सध्या शिक्षणासाठी आर्थिक पालकत्व समाजातील दानशूरांनी घ्यावं यासाठी एक योजना सुरू केली आहे. वर्षभरासाठी तीन हजार रुपये भरून या मुलाचं पालकत्व घेता येतं. त्यातून एका मुलाच्या शिक्षणाचा सारा खर्च उचलला जातो.

या सर्व उपक्रमांना आर्थिक बळ मिळण्याला सुरुवात कशी झाली याची वेगळीच कहाणी आहे. परिक्रमेवरून परतल्यावर भारती यांनी  ‘नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा’ हे पुस्तक लिहिलं. वाचकांना भावलं. सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ब्रेलमध्येही ते निघालं. ते वाचून अनेकांनी आर्थिक मदत पाठविली. कपडे, अन्नधान्य, अंथरुण, पांघरुण अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत येऊ लागल्या. भारती यांचा मुलांना शिकवण्याचा ध्यास पाहून ‘लेपा पुनर्वास’ या धरणग्रस्तांच्या वसाहतीत तेथल्या साधुबाबांनी आपल्या आश्रमाची जागा आणि इमारत त्यांच्या सुपूर्द केली. दहा-बारा गायी आणि वासरं दिली.

अर्थात जसंजशा शाळा वाढत आहेत, मुलं वाढत आहेत खर्चही वाढतो आहे. तेवढे उत्पन्नाचे स्रोत नाहीत, पण भारतीजवळ दुर्दम्य आशावाद आहे. अडचणींवर मात करणारी दुर्गा अशी तिची ओळख झालेली आहे. नवनव्या आव्हानांना ती समर्थपणे तोंड देईल आणि समाजही तिला साथ देईल, असा विश्वास आहे. भारती यांच्या या आशावादाला सलाम!

  • निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन
  • पत्ता- नर्मदालय, प्लॉट नं. १४९, मुक्काम- लेपा पुनर्वास, तहसील- कसरावद, जिल्हा- खरगोन, मध्य प्रदेश.
  • narmadalaya@gmail.com
  • bharati1@yahoo.com
  • भारती ठाकूर संपर्क : ९५७५७५६१४१
  • ‘विम’ प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा २०१६’चे सहप्रायोजक आहेत केसरी.
  • नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.