करोनाकाळात मुलांना मिळालेल्या दीर्घकालीन सुट्टीचे करायचे काय, या प्रश्नाचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण उत्तर घेऊन आलेल्या ‘लोकसत्ता’च्या ‘मधली सुट्टी’ या अभिनव उपक्रमातील पहिले सत्र आज पार पडत आहे. यात मुंबईतील नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे हे ‘ग्रहताऱ्यांचे विश्व’ या सत्रात आकाशाची सैर घडवून आणणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या वेब-कृती-संवादात मुलांना माहितीबरोबरच रंगरेषा आणि कागदी रेखीव घडय़ांमधून आकाराला येणाऱ्या कलाकृतींशीही मैत्री करता येणार आहे. सुट्टीत ज्ञानवर्धनाबरोबरच मुलांचे मनोरंजन कसे होईल याची माहिती देणारा ‘लोकसत्ता मधली सुट्टी’ हा उपक्रम आहे. १९ ते २२ मे या कालावधीत रंगणाऱ्या ‘मधली सुट्टी’ची सुरुवात आज नेहरू तारांगण मुंबईचे संचालक अरविंद परांजपे यांच्या ‘ग्रहताऱ्यांचे विश्व’ या सत्राने होत आहे. आकाशात लुकलुकणारे तारे पाहताना आपल्याला नेहमीच कुतूहल वाटते, त्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची जिज्ञासा असते. सर्वसामान्यांच्या मनात उमटणारे हे खगोलशास्त्राविषयीचे कु तूहल साध्या-सोप्या भाषेत माहिती देऊन शमवण्याची हातोटी अरविंद परांजपे यांच्याकडे आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या ‘आयुका’ या संस्थेत वीस वर्षांहून अधिक काळ विज्ञानप्रसार विभागाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. त्यानंतर २०११ पासून ते नेहरू तारांगण मुंबईचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. लहान मुलांच्या विश्वात डोकावत त्यांच्याशी संवाद साधणारा उपक्रम ‘लोकसत्ता’ने पहिल्यांदाच आखला आहे. १९ मे ते २२ मेदरम्यान दररोज संध्याकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमाचे सहप्रायोजक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित आहेत. पुढील सत्रे.. २० मे रोजी ओरिगामीतील सहजसोप्या कृती श्रीराम पत्की दाखवतील. या सत्रासाठी मुलांनी घोटीव किं वा जुन्या वह्य़ांचे कोरे कागद आणि स्के चपेन हाताशी घेऊन बसावे. २१ मे रोजी रंग रेषा आणि आकृत्यांशी कशी मैत्री करावी याविषयी चित्रकार नीलेश जाधव चित्रकलेचा तास घेतील. तर २२ मे रोजी पालकांना या संवादात सहभागी करून घेणाऱ्या ‘करोनाकाळातील पालकत्व’ या सत्रात बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप के ळकर मार्गदर्शन करणार आहेत.