महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबापुरीची तुंबापुरी झाल्याने मुंबई महापालिकेची चांगलीच फिरकी घेतली आहे. त्यांनी आपल्या द ग्रेट गॅम्ब्लर या सिनेमातील गाण्याचा फोटो ट्विट करत मुंबई महापालिकेची फिरकी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चांगलाच पाऊस पडतो आहे. याच अनुषंगाने अमिताभ बच्चन यांनी दो लफ्जो की है दिलकी कहानी.. या गाण्यातील त्यांचा आणि झीनत अमान यांचा एक फोटो ट्विट केला आहे. फोटोत हे दोघे होडीत बसले आहेत आणि भय्या जरा गोरेगाव लेना.. असे अमिताभ बच्चन नावाड्याला सांगत आहेत. फोटो पोस्ट करताना जलसाहून निघालो. असा एक संदेशही त्यांनी लिहिला आहे. T 3. Jalsa hote hue .. pic.twitter.com/PKSZuQm7ju — Amitabh Bachchan (@SrBachchan) July 2, 2019 मुंबईत पडलेल्या पावसामुळे व्यवस्थापनाचे जे काही दावे होते ते फोल ठरल्याचं चित्र आहे. कारण मुंबईकरांची दाणादाण उडाली. अशात सगळ्या स्तरातून पालिका प्रशासन आणि सरकारवर टीका होते आहे. अमिताभ बच्चन यांनी मात्र खिल्ली उडवत हा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला चांगलेच रिट्विट आणि लाईक्सही मिळत आहेत. सोमवारी मुंबईत चांगलाच पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी रात्री झालेल्या पावसाने मुंबईची चांगलीच दाणादाण उडवली. सखल भागांमध्ये पाणी साठलं. हिंदमाता, अंधेरी, भारतमाता परिसरात पाणी साठलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यासमोरही पाणी साठलं. या सगळ्यानंतर अमिताभ बच्चन यांनी टीका न करता त्यांच्या आणि झीनत अमान यांच्या गाण्यातील एक फोटो ट्विट केला आणि महापालिकेची खिल्ली उडवली.